पुणे : जिल्ह्यातील ‘शिरूर’ विधानसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी (अजित पवार), भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच, या मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. शिरूरमधील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि इच्छुक उमेदवार माऊली कटके यांनी सोमवारी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. कटके यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिरूरमधील राजकीय समीकरणे बदलली असून, कटके राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे संभाव्य उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शिरूरमधील लढत ‘राष्ट्रवादी’ विरोधात ‘राष्ट्रवादी’ अशी होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघावरून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपला हवा आहे. लोकसभा निवडणुकीतही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपने तयारी केली होती. मात्र, ऐन वेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला देण्यात आला आणि अजित पवार यांनी शिवसेनेचे (शिंदे) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षात घेत त्यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नाही. तर, भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप कंद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

हेही वाचा : ‘सारथी’च्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीची निवडयादी कधी जाहीर होणार?

महाविकास आघाडीचा विचार करता, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अशोक पवार विद्यमान आमदार आहेत. त्यांना कोणाचे आव्हान असणार, याची चर्चा सातत्याने होत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेनेचे (ठाकरे) जिल्हाप्रमुख माऊली कटके निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, ही जागा मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अन्य पक्षात जाण्याच्या दृष्टीने चाचपणी केली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे शिरूरची जागा शिवसेना (शिंदे) पक्षाकडे जाईल, अशी चर्चा सुरू झाली असतानाच कटके यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. त्यामुळे ते संभाव्य उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.