आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर शिवसेना सक्रिय झाली असून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आंदोलनाच्या निमित्ताने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू झाला आहे. पाणीकपातीच्या निर्णयाविरोधात महापालिकेत निदर्शने केल्यानंतर शहरातील समस्यांविरोधात शिवसेनेकडून मंगळवारी (९ ऑक्टोबर) जागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील सत्तेमध्ये भाजप-सेना युती असली तरी महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यानंतर मात्र भाजपला कोंडीत पकडण्याची संधी मुंबईप्रमाणे शहर शिवसेनेला साधता आली नव्हती. पेट्रोल-डिझेल, तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीसह अन्य काही मुद्दय़ांवर शिवसेनेकडून आंदोलने करण्यात आली असली तरी त्यामध्ये आक्रमकता नव्हती. शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये काही महिन्यांपूर्वी बदल करण्यात आल्यानंतर माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांना शहर प्रमुखपदाची जबाबदारी विभागून देण्यात आली. एका बाजूला विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवर जो हल्लाबोल होत आहे तो पाहता विरोधी पक्षात असून शहर शिवसेनेला तेवढी आक्रमक भूमिका घेता येत नसल्याची खंत शिवसैनिकांकडून व्यक्त होत होती. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेकडून आक्रमक पवित्रा स्वीकारण्यात आला आहे.

गेल्या आठवडय़ात पाणीकपातीचा निर्णय झाल्यानंतर महापालिका भवनावर शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. आता नागरी समस्यांची सोडवणूक करण्यात भाजपला अपयश येत असल्याचे सांगत शिवसेनेकडून जागर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, नगरसेवक या मोर्चाला उपस्थित राहणार असून शनिवारवाडय़ापासून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे.