केंद्रात, राज्यात सत्ता असूनही भाजपा पुणे शहराच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करत शिवसेनेने मंगळवारी पुणे महापालिकेवर ‘जागर मोर्चा’ नेला. या मोर्चाची दखल न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता येऊन चार वर्षांचा कालावधी झाला आहे. तसेच पुणे महापालिकेत भाजपाची एक हाती सत्ता येऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, अजूनही पुणे शहराचे प्रश्न सोडवण्यात हे भाजपा सरकार अपयशी ठरल्याचा आरोप शिवसेनेने केला. मंगळवारी शनिवारवाडयापासून ते पुणे महापालिकेवर जागर मोर्चा काढण्यात आला. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळा कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी शहर प्रमुख माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, पुणे महापालिकेतील गटनेते संजय भोसले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना पुणे जिल्हा संपर्क बाळा कदम म्हणाले की, पुणे शहरातील शिवसृष्टी, मेट्रो, नदी सुधार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासारखे अनेक प्रश्न सोडवण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मंगळवारी जागर मोर्चा काढावा लागला असून या मोर्चाची सरकारने दखल न घेतल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.