यंदा अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जनासाठी मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाकडून बुधवारी सांगण्यात आले. त्यामुळे मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदांमध्येच श्रींचे विसर्जन करावे लागणार आहे.

दरवर्षी गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती श्रींचे विसर्जन नदीत करण्यात येते. मात्र, यंदा धरणामधून पाणी सोडण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून एकूण पाणीसाठा २९.०२ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.५७ टक्के झाला आहे. चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा झालेला असतानाही गणेश विसर्जनासाठी यंदा पाणी सोडण्यात येणार नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> पुणे : गणेश विसर्जनासाठी महापालिकेची तयारी पूर्ण

‘गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे खडकवासाला धरणातील पाणीसाठा ९६ टक्के झाला आहे. गुरुवार आणि शुक्रवारी धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस पडला, तर खडकवासला धरण पुन्हा १०० टक्के भरेल. परिणामी नदीत पाणी सोडण्यात येईल. मात्र, गणेश विसर्जनासाठी नदीत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले नाही. कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नसल्यामुळे अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही’, अशी माहिती खडकवासला प्रकल्पाचे सहायक अभियंता यो. स. भंडलकर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा गणेश विसर्जनासाठी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन नाही. धरणांत पाऊस नसल्याने यंदा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार नाही.– विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग