पुणे : किल्ले शिवनेरी येथे मधमाश्यांनी रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास केलेल्या हल्ल्यात पाच बालकांसह १६ पर्यटक जखमी झाले. शिवाई देवी मंदिराजवळ हा प्रकार घडला. बहुतांश जखमी जालना, पुणे, श्रीवर्धन येथील होते. मधमाश्यांनी हल्ला केल्याची गेल्या दोन महिन्यांतील ही चौथी घटना होती.

उन्हाची तीव्रता जास्त असल्याने पाण्याचे पाझर असलेल्या ठिकाणी मधमाश्या जमा झालेल्या होत्या. या ठिकाणी मुंबईचे काही पर्यटक परफ्यूम लावून आले होते. त्या वासाने चवताळलेल्या माश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. किल्ल्याच्या पायथ्याकडे पळणाऱ्या पर्यटकांना तेथे असलेले पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी खाली घेऊन आले.

दरम्यान, ही माहिती मिळताच जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य राजकुमार चव्हाण, अतिक सय्यद, महेंद्र नवले रुग्णवाहिकेसह गडपायथ्याजवळ आले. पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी गोकुळ दाभाडे यांनी मधमाश्यांच्या डंखांनी जखमी झालेल्या एका महिलेसह दोन बालकांना तातडीने गडपायथ्याशी आणले. तेथून जखमींना जुन्नरच्या छत्रपती शिवाजी शासकीय रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

दोन महिन्यांतील चौथी घटना

दोन महिन्यांपूर्वी शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) मुख्यमंत्र्यांची सभा संपल्यानंतर काही वेळातच मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात दहाजण जखमी झाले होते.

तिथीनुसार शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला (१६ मार्च) मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जण जखमी झाले होते.

शिवजयंतीला (१७ मार्च) राज्याचे मंत्री नितेश राणे यांचे शिवकुंजमध्ये भाषण सुरू असताना मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये २० जण जखमी झाले होते.