पुणे : मराठी साहित्यामध्ये छंदोबद्ध कवितेइतकेच मुक्तछंदातील कवितेचेही स्थान आहे. मुक्तछंद हे स्वातंत्र्य असले तरी स्वैराचार नाही याचे भान कवींनी ठेवले पाहिजे. कविता हा अत्यंत सोपा साहित्यप्रकार आहे, असे सध्याच्या काळातील कवींना वाटते. त्यामुळेच कुणीही उठतो आणि कवी होतो. यातूनच कवी टिंगलीचा विषय होतो, अशा शब्दांत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे यांनी कवींना कानपिचक्या दिल्या. त्याचा परिणाम म्हणून कविता या साहित्यप्रकाराला तसेच कवीला गांभीर्याने घेतले जात नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले,

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे डाॅ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रसिद्ध कवयित्री वर्षा कुलकर्णी यांना काव्य जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी मोरे बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आडकर आणि कार्याध्यक्ष मैथिली आडकर या वेळी उपस्थित होत्या.

‘ओवीबद्ध, छंदबद्ध लेखनाचे तंत्र आणि शास्त्र अवलंबावे असे वाटत सध्याच्या कवींना वाटत नाही. काव्यलेखन करताना कवींनी व्याकरणाला सुटी देणे, छंदबद्धता नाकारणे योग्य नाही’, असे सांगतानाच मोरे यांनी आपल्या भाषणामध्ये मराठीच्या समृद्ध काव्य परंपरेविषयी भाष्य केले.

कुलकर्णी म्हणाल्या, काही वर्षांपूर्वीपर्यंत कविता लेखनाचे शास्त्र असते याविषयी मला कल्पना नव्हती. परंतु साहित्य क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चा, साहित्यप्रेमींचे अभिप्राय, अनेक कवितांचे रसग्रहण अशा विविध प्रकारांतून मी हे तंत्र समजावून घेतले आणि या विषयावर सोप्या मराठी भाषेत छोटे लेख लिहिले. वडिलांनी पाठपुरावा केल्यामुळे या लेखांचे पुस्तकरूपात प्रकाशन झाले. काव्य लेखन करताना कवितेचा आशय, आत्मा, कला आणि शास्त्र यांचा संगम जितका महत्त्वाचा तितकेच काव्याचे बीज पुरेसे रुजल्यानंतर त्याला बहरू द्यावे. आयुष्यभर विद्यार्थी राहून संपूर्णत्वाचा अट्टाहास न धरता कला व्रत म्हणून जोपासली जावी.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात झालेल्या कविसंमेलनात प्रभा सोनवणे, स्वप्नील पोरे, तनुजा चव्हाण, वैजयंती आपटे, नचिकेत जोशी, मिलिंद छत्रे, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार, डॉ. मंदार खरे, डॉ. ज्योती रहाळकर, ज्योती उटगीकर-देशपांडे, सुजाता पवार यांचा समावेश होता. निरुपमा महाजन यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. प्राजक्ता वेदपाठक यांनी कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. आडकर यांनी प्रास्ताविकात पुरस्काराविषयीची माहिती दिली, शिल्पा देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.