पुणे : मावळमध्ये भाजप दुहेरी डाव खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. लोकसभेत महायुतीचा धर्म, राष्ट्रवादी पक्ष आणि अजित पवार महत्वाचे वाटले. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा पक्ष आणि आमदार नको आहे. मावळ गोळीबाराचा विषय काढून राष्ट्रवादीला मदत करू नका असं आवाहन नागरिकांना केलं जात आहे. असा प्रचार सुरू असल्याचं सांगत शरद पवार गटाचा उमेदवार उभा राहिल्यास त्याला मदत झाली पाहिजे अशी भाजपची भूमिका असल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे. ते मावळमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

सुनील शेळके म्हणाले, “भाजपा पक्षातले काहीजण गावा-गावांमध्ये जाऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करायची नाही, असं सांगत आहेत. मागच्या दीड वर्षात असं ते कधीही बोललेले नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म महत्त्वाचा आहे. तो पाळून आपण काम केलं पाहिजे. असं म्हणणारी भाजप आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात काम करत आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा धर्म पाळून आपण काम केलं पाहिजे असं जे बोलत होते. तेच आता मावळमधील गावा-गावांमध्ये जाऊन अजित पवारांनी गोळीबार केला. शेतकऱ्यांना शहीद व्हावं लागलं. त्या पक्षाला मदत करू नका असा प्रचार करत आहेत.”

आणखी वाचा-आधी सिद्धेश कदम यांची भेट अन् महिनाभरातच मर्सिडीज बेंझ अडचणीत!

“भाजपमधील कार्यकर्त्यांना भडकून दिले जात आहे. त्यांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. आपण कसे पक्षाचे निष्ठावंत आहोत हे दाखवलं जात आहे. हे सर्व करत असताना शरद पवार यांचा उमेदवार उभा राहिल्यास त्याला मदत झाली पाहिजे. अशी भाजपची भूमिका दिसत आहे.” असा आरोप आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांना पहिल्यांदा विरोध करणाऱ्या शेळके यांना देखील आगामी विधानसभा निवडणूक सोपी जाईल असं दिसत नाहीत. महायुतीतच धुसपुस सुरू झाली आहे. शेळके यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. त्यांनी देखील भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळं मावळ विधानसभेत महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.