पुणे : दिवाळीनिमित्त मिठाई, खवा, पनीर, तूप, खाद्यतेलांसह इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून खाद्यपदार्थांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येते. यंदा या मोहिमेला खीळ बसली आहे. विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याचा फटका या मोहिमेला बसत आहे.

नागरिकांना सकस, भेसळमुक्त व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागावर असते. दिवाळीच्या कालावधीत अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे दिवाळीनिमित्त मिठाई, मावा उत्पादक व वितरकांनी ग्राहकांना दर्जेदार ताजी व सकस मिठाईची विक्री करावी. अन्न विषबाधेसारखा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विभागाकडून मोहीम हाती घेण्यात येते. यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी भेसळ रोखणारी मोहीम राबविण्यात विभागाला अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत.

आणखी वाचा-दिवाळीत चितळे बंधू मिठाई विक्री दुकानात चोरी, गल्ल्यातील दीड लाखांची रोकड लंपास

यंदा विधानसभा निवडणुकीमुळे विभागातील बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामावर आहेत. यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सांभाळून भेसळ रोखण्यासाठी मोहीम राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकारी आणि कर्मचारी एकाच वेळी दोन्ही कामे असे करणार, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

ग्राहकांनी अन्नपदार्थाच्या वेष्टनावरील बॅच क्रमांक, लॉट क्रमांक, पदार्थ वापरण्याची मुदत, उत्पादन दिनांक, अन्न नोंदणी क्रमांक, अन्न परवाना क्रमांक आदी तपासूनच तो खरेदी करावा. अन्नपदार्थावर अशी माहिती नसल्यास त्याची खरेदी करणे टाळावे. मिठाई खरेदी केल्यानंतर ती लवकर संपवावी. मिठाई ताजी व सकस आहे याची खात्री करावी. याचबरोबर अन्नपदार्थ खरेदी करताना विक्रेत्याकडून देयक घ्यावे म्हणजे फसवणूक होणार नाही. कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जाबाबत तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ येथे तक्रार नोंदवावी.

आणखी वाचा-खेड शिवापूर टोलनाका परिसरात एक कोटींचा गुटखा जप्त, कर्नाटकातील गुटख्याची पुण्यात विक्री

उत्पादकांनी याचे पालन करावे…

  • अन्नपदार्थ तयार करण्याची जागा स्वच्छ ठेवावी.
  • पदार्थ बनविण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.
  • परवानाधारक व्यावसायिकांकडून कच्चा माल खरेदी करावा.
  • पदार्थ बनविण्याची भांडी स्वच्छ व झाकणबंद असावीत.
  • अन्नपदार्थ स्वच्छ, सुरक्षित ठिकाणी जाळीदार झाकणाने झाकूण ठेवावेत.
  • कामगारांना त्वचा व संसर्गजन्य आजार झालेला नसावा.
  • कामगारांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करावी
  • खाद्यतेलाचा तळण्यासाठी पुनर्वापर करू नये.

अन्न व औषध प्रशासनाचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी सध्या विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर आहेत. यामुळे त्यांनी आपली निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सांभाळून दिवाळीच्या काळात राबविण्यात येणारी भेसळ प्रतिबंधक मोहीम राबवावी, असे निर्देश दिले आहेत. -सुरेश अन्नापुरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन