पुणे : भूमी अभिलेख विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या ४६४४ पदांसाठी गुरूवारपर्यंत चार लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जुलै असून अजून किमान दोन ते अडीच लाख अर्ज येण्याची शक्यता आहे.
राज्यात ३६ जिल्हे असून महसूल विभागानुसार कामकाज सुरू असते. याच महसूल विभागाअंतर्गत अगदी गावपातळीवर तलाठ्यांमार्फत सर्व कारभार सुरू असतो. मात्र, राज्यात सुमारे चार हजारहून अधिक तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे महसूलासंदर्भात गाव पातळीवर विविध प्रकारचे कामकाज करणे अवघड होऊ लागले आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यात रिक्त असलेली तलाठ्यांची पदे भरण्याची निर्णय घेतला आहे. त्यानुसार भूमी अभिलेख विभागाने तलाठी पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार आता राज्यात साडेचार हजार तलाठी उपलब्ध होणार आहेत. विविध प्रकारच्या आरक्षणाबाबतचा सविस्तर अहवालबाबत एक शुद्धीपत्रक संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे. तलाठी पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. १७ जुलैनंतर छाननी होऊन त्यानंतर परीक्षा होणार आहे.
हेही वाचा >>>पुणे : पतीच्या अंगावर ओतले उकळते पाणी…’हे’ कारण
हेही वाचा >>>प्रवास यातना! गळक्या गाड्या, झुरळे अन् अस्वच्छतेने रेल्वे प्रवासी हैराण
ऑक्टोबरमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर निवडसूची तयार करण्यात येणार असून निवडसूची केल्यानंतर तलाठी पदावरील कर्मचारी कामावर रुजू होण्यास नवे वर्ष उजाडण्याची शक्यता आहे, असे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले.तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांची वयोमर्यादा मोजण्यासाठी १७ जुलै २०२३ हा दिनांक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे.