पुणे : ‘ज्यातून काहीही फलनिष्पत्ती होत नाही, अशा साहित्य संमेलनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्या तुलनेत अभिजात भाषा म्हणून मराठीला मिळणारे १० कोटी रुपये ही फार मोठी रक्कम नाही,’ अशी टीका करून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी साहित्य संमेलनाच्या उपयुक्ततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘मराठीचा वाचक दिवसागणिक म्हातारा होत चालला असून तरुण पिढी इंग्रजीकडे वळत आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी सगळ्या घटकांचा समन्वय साधत एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल विदिशा विचार मंच आणि कोहिनूर ग्रुप यांच्या वतीने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या हस्ते प्रकाशकांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, मंचच्या संचालक ममता क्षेमकल्याणी या वेळी उपस्थित होत्या.

कार्यक्रमात राजहंस प्रकाशनाचे संपादक शिरीष सहस्रबुद्धे, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे, ज्योत्स्ना प्रकाशनाचे मिलिंद परांजपे, संस्कृती प्रकाशनाच्या सुनीताराजे पवार आणि मिहाना पब्लिकेशन्सच्या अमृता कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

पठारे म्हणाले, ‘‘ज्ञानकोश’कार श्रीधर व्यंकटेश केतकर, रा. भि. जोशी यांच्यासारख्या पूर्वसुरींनी केलेले काम प्रकाशकांनी वेळोवेळी प्रकाशित केले. त्यामुळेच मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्याकरिता सरकारदरबारी बाजू ठामपणे मांडता आली. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यामध्ये प्रकाशकांसह मराठी भाषक नागरिक, वाचक, साहित्य क्षेत्रातील संस्था, लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या परीने आवाज उठवला.’

‘भाषा जेवढी प्रदूषित होते, तेवढा तिचा विस्तार होतो. इंग्रजी भाषा हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण असून, मराठी भाषेनेही इतर भाषांमधील शब्द स्वीकारून त्याचा विस्तार केला पाहिजे,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.

भाषा शुद्ध किंवा अशुद्ध असे काहीही नसून मराठीची सर्व रूपे एकमेकांना बळ देणारी आहेत. त्यामुळे एकमेकांचा आदर करून मराठी भाषा जोजवली पाहिजे. आपणच मराठी भाषेचे मारक ठरलो असून हिंदीमध्ये संवाद साधून आपली भाषा सोडत आहोत. जो स्वत:ची भाषा सोडतो, ती भाषा कालांतराने लोप पावते. – प्रा. रंगनाथ पठारे, ज्येष्ठ साहित्यिक