पुणे : देशाचे नाव भारत हेच राहिले पाहिजे. इतर कोणत्याही देशाची दोन नावे नाहीत. भारत नावाला एक सभ्यता मूल्य आहे. भारताला प्रेरणादायी इतिहास आहे, देशाला सामाजिक आणि राजकीय परंपरा आहे. त्यामुळे देशाचे नाव भारत हेच हवे याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीमध्ये चर्चा झाली. देशाचे नाव भारत हेच राहिले पाहिजे, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असल्याची माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी शनिवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीची बैठक गेल्या तीन दिवसांपासून स. प. महाविद्यालय येथे सुरू आहे. देशभरातील ३६ संघटनांचे २६७ प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. तीन दिवसांच्या बैठकीत नेमके काय घडले याची माहिती डॉ. मनमोहन वैद्य यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर या वेळी उपस्थित होते. डॉ. वैद्य म्हणाले, संघ कार्यामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी विचार करण्यात आला. विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशातून विभाग स्तरावर महिला संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. महिला संपर्काच्या माध्यमातून ऑगस्टपासून जानेवारीपर्यंत देशात ४११ महिला संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. आतापर्यंत १२ प्रांतांमध्ये ७३ ठिकाणी महिला संमेलन झाले असून त्यामध्ये एक लाख २३ हजार महिला सहभागी झाल्या आहेत.

संघ संपर्कात येणाऱ्या नव्या लोकांना संघाचे काम समजण्यासाठी संघ परिचय वर्ग घेतले जातील. संघ कार्य वाढत असून समाजाचा संघाच्या कार्यामध्ये सहभाग वाढत आहे. संघ समाजात सांस्कृतिक काम करत आहे. देश विरोधी शक्ती कमी होत असून देशाला पुढे नेणाऱ्या शक्तीचे काम वाढत आहे. मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि तेथील अशांत परिस्थिती यावर चर्चा करण्यात आली. ही स्थिती चिंताजनक असून यामध्ये तेथील सरकारने निर्णय घेणे अपेक्षित असल्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. दोन समाजातील वाद मिटवण्यासाठी संघ कार्यकर्ते काम करत आहेत, याकडे वैद्य यांनी लक्ष वेधले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना अनेक वर्ष समाजाने बाजूला ठेवले आहे. त्यांना आरक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले जावे ही संघाची भूमिका असल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले. अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना जानेवारीत मकर संक्रांतीनंतर मुहूर्तावर करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

‘ते तुम्ही नड्डांना विचारा!’

२०२४ च्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने नेमकी काय मांडणी करण्यात आली, असे विचारले असता ‘हा संघाचा विषय नाही. काय मांडणी केली ते तुम्ही जे. पी. नड्डा यांनाच विचारा’, असे डॉ. मनमोहन वैद्य यांनी सांगितले. केंद्र सरकारला काही सूचना करण्यात आल्या आहेत का, या प्रश्नावर ‘सरकारला काही सांगण्याचे हे व्यासपीठ नव्हते’, असे वैद्य यांनी स्पष्ट केले. सरकारच्या कामगिरीविषयी संघ समाधानी आहे, या प्रश्नाला वैद्य यांनी थेट उत्तर दिले नाही. मात्र, देशात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर १८ मे २०१४ च्या संडे गार्डियनच्या संपादकीयमध्ये ‘ब्रिटिश फायनली रुल्ड आऊट‘ असे प्रसिद्ध झाले होते, हा दाखला वैद्य यांनी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The name of the country should remain bharat role of rashtriya swayamsevak sangh ysh
Show comments