पुणे : महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाभरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली. त्यात नीलेश देशमुख यांनी राज्यात पहिला, तर सागर गायकवाड यांनी अराखीव गटातून पहिला क्रमांक मिळवला.
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-२०२१ च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या ६२६ उमेदवारांच्या मुलाखती पुण्यातील यशदा येथे १० ते १३ एप्रिल दरम्यान घेण्यात आल्या. उमेदवारांच्या मुलाखतीचा झाल्यानंतर केवळ एका तासाभरातच सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. या परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे कृषिसेवा गट-अ आणि गट-ब संवर्गातील नियुक्तीसाठी २०३ उमेदवार शिफारसपात्र ठरू शकतील अशी माहिती एमपीएससीने दिली.