पुणे : चोरट्यांनी दुकानांचे कुलूप उचकटून आंबा बर्फी, सुकामेव्याची पाकिटे चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. कोंढवा भागातील एका मद्यालयातून चोरट्यांनी रोकड आणि मद्याच्या बाटल्या असा ४० हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत शुभम अण्णासाहेब तापकीर (वय २९, रा. नवनाथनगर, तळजाई परिसर, धनकवडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तापकीर यांचे कोंढवा परिसरात राजजी बार अँड रेस्टोरंट आहे.

हेही वाचा >>> पुणे : चोरट्यांचा आंबा बर्फीवर ताव; मिठाई विक्री दुकानातून रोकड, अडीच किलो आंबा बर्फी चोरीस

चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील रोकड चोरली, तसेच मद्याच्या बाटल्या चोरून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक शबाना शेख तपास करत आहेत. शहरातील दुकानांचे कुलूप तोडून चोरी करण्याच्या घटनांमध्ये झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावरील एका मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि अडीच किलो आंबा बर्फी चोरून नेली होती. त्यानंतर वारजे भागातील एका सुकामेवा विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुकामेव्याची पाकिटे आणि गल्ल्यातील रोकड चोरून नेली होती.