पुण्यातील नवले ब्रिज येथील मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणार्‍या भूमकर पुलाच्या उतारावर आयशर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना चिरडले. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. हेमंत यशवंत तळेले, चेतन रमेश सोळंकी आणि नितीन चंद्रकांत ढवळे अशी मृतांची नावे आहेत. यापैकी चेतन सोळंकी याचा १५ दिवसांपूर्वीच विवाह झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

सिंहगड पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (२८ डिसेंबर) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भूमकर पुलाच्या तेथून काही अंतरावर असलेल्या जागेवर ३ तरुण थांबले होते. त्याचवेळी अचानक एक आयशर ट्रकने त्यांना जोरात धडक दिली. तसेच काही अंतर फरफटत नेले. त्यामध्ये तिघांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

हेही वाचा : जळगावात ट्रकची रिक्षाला जबर धडक, तिघे जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी

या तिघांपैकी ३१ वर्षीय चेतन रमेश सोळंकी (तालुका- शिरपूर, जिल्हा – धुळे) हा कामावर जाण्यासाठी थांबला होता. मात्र, काही समजण्याच्या आतमध्ये आयशर ट्रने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. चेतनचं १५ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. तो सर्व सामान्य कुटुंबातील होता. मृत चेतनला दोन बहिणी असून त्यापैकी एकीचे लग्न झाले होते, तर दुसर्‍या बहिणीचे लग्न होणे बाकी आहे.