पिंपरी : श्रावणी पोर्णिमेनिमित्त इंद्रायणी नदीची पूजा करण्यासाठी घाटावर गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. तर, एकजण बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. ही दुर्घटना सोमवारी (१९ ऑगस्ट) सकाळी साडेआठच्या सुमारास मोशीतील तापकीर वस्ती येथे घडली.जय ओमप्रकाश दायमा (वय १९, रा. वणी, नाशिक) आणि ओंकार श्रीकृष्ण पाठक (वय १६, रा. पद्मावती गल्ली, लातूर) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. प्रणव रमाकांत पोतदार (वय १७, रा. खडा, अष्टी, जि. बीड) हा बेपत्ता आहे. अर्चित दीक्षित आणि चैतन्य पाठक हे दोघे वाचले आहेत.

मोशीतील हवालदार वस्ती येथे वेदश्री तपोवनचे वैदिक विद्यालय आहे. विद्यालयातील ७१ विद्यार्थी हे गुरूजी महेश नंदे यांच्यासमवेत सोमवारी सकाळी इंद्रायणी नदीची पूजा करण्यासाठी आले होते. पूजा करताना ओंकार, प्रणव, अर्चित आणि चैतन्य हे चौघे बुडाले. त्यांनी आरडाओरडा करताच जय हा त्यांना वाचविण्यासाठी गेला. त्याने अर्चित आणि चैतन्य या दोघांना वाचवले. मात्र, त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात जयच्या नाका-तोंडात पाणी गेले. त्यामुळे त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्याला त्वरित महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हेही वाचा >>>बारामतीमधून निवडणूक लढविण्यात ‘रस’ नसलेल्या अजित पवारांना शिरूमधून निमंत्रण !

पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एनडीआरएफ, पिंपरी – चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभाग, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि आळंदी येथील एक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारी दोनच्या सुमारास ओंकारचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. तर, प्रणव याचा शोध उशिरापर्यंत सुरू होता.

याप्रकरणी ‘अपघाती मृत्यू’ अशी नोंद करण्यात आली आहे. तपासानंतर जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. अंधार पडल्याने शोध मोहीम थांबविली आहे. सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी सांगितले.