पुणे : यंदाच्या पावसाळ्यात दोन जुलैपर्यंत राज्यातील प्रमुख धरणांमधील एकूण पाणीसाठा ३१२.४३ टीएमसी म्हणजेच २१.८४ टक्के इतकाच आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अमरावती, विदर्भात तुलनेने जास्त, तर पुणे आणि औरंगाबाद विभागांत सर्वांत कमी पाणीसाठा आहे.

जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता सुमारे १४३०.६३ टीएमसी आहे. त्यापैकी दोन जुलैअखेर २१.८४ टक्के म्हणजे ३१२.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. विभागनिहाय विचार करता, नागपूर विभागातील धरणांची पाणी साठवण क्षमता सुमारे १६२.७० टीएमसी आहे. क्षमतेच्या ३५.३६ टक्के म्हणजे सुमारे ५७.५३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

हेही वाचा : राज्यातील द्राक्षांची जगाला गोडी, ५० देशांना निर्यात

अमरावती विभागातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १३६.७५ टीएमसी असून, ३७.८० टक्के म्हणजे ५१.६९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मराठवाडा विभागातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे २५६.४५ टीएमसी इतकी असून, ९.६२ टक्के म्हणजे २४.६७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नाशिक विभागातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता २०९.६१ टीएमसी असून, धरणांत २२.२७ टक्के म्हणजे ४६.६८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पुणे विभागातील धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ५३७.२८ टीएमसी इतकी असून, धरणांत १६.३१ टक्के म्हणजे ८७.६२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोकण विभागातील धरणांची साठवण क्षमता १३०.८४ टीएमसी असून, धरणांत ३३.८२ टक्के म्हणजे ४४.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

राज्यातील धरणांत दोन जुलैअखेर २१.८४ टक्के म्हणजे ३१२.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. पावसाचे अजून तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे धरणे नक्कीच भरतील. पण, पश्चिम घाटातून कोकणात, समुद्राकडे वाहून जाणारे पाणी प्राधान्याने अडविले पाहिजे, अन्यथा नजीकच्या भविष्यात टंचाई अटळ आहे.

हरिश्चंद्र चकोर, निवृत्त अभियंता जलसंपदा विभाग

हेही वाचा : पिंपरी पोलिसांकडून आणखी दोन टोळ्यांवर ‘मोक्का’, आतापर्यंत ९८ गुन्हेगारांवर कारवाई

राज्यातील प्रमुख धरणांची स्थिती

धरण: उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)

मोडक सागर : १.०३८

तानसा : ०.९९३

भातसा : ८.३३५

पानशेत : २.१००

भाटघर : २.६६०

उजनी : – २२.११
कोयना धरण : १६.०६
राधानगरी : २.०६०
जायकवाडी : ३.४१३०
गोसीखुर्द : ६.७३२
काटेपुर्णा : ०.४०३
ऊर्ध्व वर्धा : ८.७६९