पानशेत वरसगाव धरण परिसरातील गावांमधील वीज, रस्ते, पाणी आदी प्रश्नांबाबत शासनाकडून सुधारणा न झाल्यास ३ एप्रिलला पानशेत आणि वरसगाव धरणांमधून पाणी सोडून दिले जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानी मावळा विकास संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.
संस्थेचे राजेश निवंगुणे यांनी पत्रकार परिषदेत ग्रामस्थांच्या समस्यांची माहिती दिली. मीटरचे रिडिंग न घेताच वीजबिले आकारण्यात येत असल्याने मीटरचे फोटो काढून बिलांची आकारणी व्हावी, पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, पानशेत ते घोल रस्ता आणि पानशेत ते लवासा रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, या भागातील नागरिकांना दारिद्रय़ रेषेखालील यादीत समाविष्ट करावे, रहिवाशांच्या सोयीसाठी वेल्हे मार्गे पानशेत ते कादवे खिंड अशी छोटी बस चालू करावी, पानशेतमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे आणि धरणग्रस्त तरुणांना नोकरी द्यावी, आदी मागण्या संस्थेतर्फे करण्यात आल्या आहेत. या मागण्यांवर उत्तर न मिळाल्यामुळे ३ एप्रिल रोजी दोन्ही धरणांतून पाणी सोडू दिले जाणार नाही, असा इशारा संस्थेतर्फे देण्यात आला आहे.