पुणे : राज्यामध्ये असलेल्या लहान-मोठ्या २९९७ धरणांनी तळ गाठला असून, सध्या ३१५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे अवघा २२.०६ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. औरंगाबाद विभागात सर्वांत कमी ८.७८ टक्के पाणीसाठा असून, त्या खालोखाल पुणे विभागात १५.६७ टक्के पाणी आहे. गेल्या वर्षी मेअखेरीस ३०.९४ टक्के पाणीसाठा होता. अवकाळी पावसामुळे विदर्भाला मात्र दिलासा मिळाला आहे.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, राज्यात ३१ मेअखेरीस सर्व धरणांत मिळून ३१५ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. नागपूर विभागात ३८.१७ टक्के, अमरावती विभागात ३८.५६ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ८.७८ टक्के, नाशिक विभागात २४.०६ टक्के, पुणे विभागात १५.६७ टक्के आणि कोकण विभागात ३४.२२ टक्के पाणीसाठा आहे.
विदर्भ, अमरावती, नाशिक विभागात झालेल्या अवकाळी पावसामुळे धरणांत चांगला पाणीसाठा आहे. तरीही सरासरीपेक्षा कमीच पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागात टंचाईची स्थिती आहे. तेथील धरणांतील पाणीसाठा ८.७८ टक्के म्हणजे ६४ टीएमसी आहे. यापैकी बहुतेक धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. अनेक धरणांतून शेतीला किंवा पिण्यासाठी पाणी सोडण्यास कालव्यांची सुविधा नाही. त्यामुळे धरणांत पाणी असूनही त्याचा शेती किंवा पिण्यासाठी थेट वापर करता येत नाही, अशी अवस्था आहे.
राज्यात मागील दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या समस्येची दाहकता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. जनावरांसाठीच्या पाण्याची सोयही अवकाळीमुळे झाली आहे. प्रामुख्याने विदर्भाला अवकाळीने मोठा दिलासा दिला आहे. अवकाळी पाऊस झालेल्या ठिकाणी टँकरची संख्याही कमी झाली आहे.
विभागनिहाय पाणीसाठा (स्रोत : जलसंपदा विभाग)
छत्रपती संभाजीनगर – ८.७८ टक्के
पुणे -१५.६७ टक्के
नाशिक – २४.०६ टक्के
कोकण – ३४.२२ टक्के
नागपूर – ३८.१७ टक्के
हेही वाचा…पुणे तेथे पाणी उणे होऊ नये म्हणून…
अमरावती – ३८.५६ टक्के
राज्यातील सरासरी पाणीसाठा – २२.०६ टक्के
© The Indian Express (P) Ltd