पिंपरी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा चार दिवसांवर आला असताना आळंदी येथील इंद्रायणी नदीतील पाण्यावर जलप्रदूषण, रसायनमिश्रीत पाण्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तवंग (फेस) आला आहे. मागील सलग पाच दिवसांपासून नदीतील पाण्यावर तवंग येत आहेत. त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. वारक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंद्रायणी नदीचा उगम हा लोणावळा परिसरातून झाला. ही नदी अनेक गावे, शहर पार करत आळंदीतून पुढे वाहत जाते. इंद्रायणी नदीचे १९ किलोमीटर पात्र पिंपरी-चिंचवड शहरातून वाहते. शहरातील औद्योगिक वसाहती, इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी, गावांमधील मैलायुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. मैलायुक्त पाणी हे इंद्रायणी नदीला प्रदूषित करत आहे. इंद्रायणी नदी पात्रात लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करून माऊलींचे दर्शन घेतात. परंतु, नदीची अवस्था बघता लाखो वारकऱ्यांचे आणि आळंदीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच जलपर्णीने इंद्रायणीचा श्वास गुदमरत आहे. आता त्यात जलप्रदूषणाची भर पडली असून अवघ्या नदी पात्रात तवंग दिसत आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्यानेच नदीची अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या पाच दिवसांपासून पुन्हा आळंदीत पाण्यावर तवंग येत आहेत.

इंद्रायणी नदीबाबत प्रशासन उदासीन

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत प्रशासन उदासीन दिसते. कार्तिकी यात्रा उत्सवाच्या दरम्यानही नदीतील पाण्यावर तवंग आला होता. कोणत्या भागातून सांडपाणी नदीत मिसळते, याबाबत वारकरी संप्रदायाने प्रशासनाला माहिती दिली होती. पण, कोणतीही उपाययोजना झाली नसल्याची खंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख निरंजननाथ महाराज यांनी व्यक्त केली.

ग्रामपंचायत, नगरपंचायतींना नोटीसा

पिंपरी महापालिका ते लोणावळा दरम्यानच्या नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींच्या सांडपाण्यामुळे प्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला आहे. या सर्व शासकीय कार्यालयांना नोटीसा धाडल्या आहेत. या शासकीय कार्यालयांनी त्यांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) अद्ययावत केले नसल्याने आणि त्यातून दूषित पाणी नदीत सोडल्याने इंद्रायणी अशी जीवघेणी झाल्याचे सर्व्हेक्षणात समोर आले आहे.

आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तोंडावर नदीतील पाण्यावर तवंग आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील सांडपाणी, औद्योगिक रसायनमिश्रित पाणी नदीत सोडले जाते. इंद्रायणी भीमाला मिळते आणि भीमा पंढरपुरातील चंद्रभागेला मिळते. त्यामुळे तिन्ही नद्या प्रदूषित होतात. नदी प्रदूषणाबाबत ठोस उपायोजना करावी. आळंदी ग्रामस्थ, देवस्थान आणि नदी प्रदूषण मुक्तीसाठी काम करणा-या सामाजिक संघटनांची एक समिती स्थापन करावी. दर तीन महिन्यांनी आढावा घ्यावा. जेणेकरुन प्रदूषणावर उपाययोजना करता येतील.-निरंजननाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख,आळंदी देवस्थान

चाकण बाजुने एमआयसी क्षेत्राच्या बाहेर अनधिकृत व्यावसाय उभारले आहेत. तेथून ११ नाले इंद्रायणीत मिळतात. महापालिकेच्या बाजूने कोणतेही सांडपाणी नदीत जाऊ नये यासाठी कुदळवाडीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) कार्यान्वित केला आहे. चिखलीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे आहे. सांडपाणी नदीत जाणार नाही याची काळजी घेतली आहे. याव्यतिरिक्त जे पाणी येत आहे. त्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाने काळजी घ्यावी.- संजय कुलकर्णी,सह शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

इंद्रायणी नदीप्रदूषणाबाबत नगरपरिषदा, ग्रामपंचायतींना नोटीसा पाठविल्या आहेत. सांडपाणी नदीत मिसळणार नाही, याची दक्षता घेण्याचे सांगितले आहे. जलपर्णी काढण्याची सूचना केली आहे. नदी प्रदूषित करणा-यांवर लक्ष ठेवण्यासाठी सहा लोकांच्या तीन चमू कार्यान्वित केल्या आहेत.-रवींद्र आंधळे, प्रादेशिक अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water pollution in indrayani river at alandi pune print news ggy 03 amy