ता. ना. मुंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Loksatta Pune Vardhapan 2023 : शहराला किती पाणी लागते, ग्रामीण भागातील शेतीसाठी किती पाणी लागते या नुसार पाण्याचे नियोजन केले जाते. पुणे शहराला पुरण्याइतके पाणी धरणांत उपलब्ध आहे. मात्र पुण्यात पर्जन्य जल पुनर्भरणाचा वापर अतिशय कमी आहे. पाणी शिळे झाले म्हणून फेकून देण्याची आपल्याला सवय आहे. मात्र, धरणांमध्ये पावसाळ्यात पडलेल्या पावसाचे पाणीच साठवून ठेवलेले असते. सध्या फेब्रुवारी महिना सुरू आहे. म्हणजे आता जे आपल्या नळाला पाणी येते, ते धरणात पावसाळ्यात साठवून ठेवलेले पाणी आहे. त्यामुळे पाणी शिळे झाले, ते फेकून द्या. या कल्पना सोडून द्यायला हव्यात.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणे प्रारूप : समृद्ध आर्थिक शक्तिस्थळ निर्माणाचे धडे

पुण्याचा विचार केल्यास कमी पाणी ही समस्याच नाही. पुण्याभोवती एवढी जवळजवळ मोठ-मोठी धरणे आहेत. त्यामुळे पाणी उपलब्धता ही समस्याच नाही. पर्जन्य जल पुनर्भरण, पाणी वितरण प्रणाली, सांडपाणी व्यवस्थापन यांमध्ये कार्यक्षमता वाढवली पाहिजे. तसेच पाण्याचा योग्य मोबदला आणि जलमापकाद्वारे पाणी देणे हे उपाय योजल्यास पुण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल. आता उपलब्ध असलेल्या पाण्याचा या पद्धतीने वापर केल्यास पाणी पुरून उरेल. त्यामुळे पुण्याचा पाण्याचा प्रश्न आपणच तयार केला असून त्याचे उत्तर महापालिकेला या उपायांची अंमलबजावणी करूनच शोधावे लागणार आहे.

पुण्याभोवती जेवढी धरणे आहेत, तेवढी कोणत्याच शहराभोवती नाहीत. आपण सह्याद्रीच्या घाटात असून वरच्या बाजूला धरणे आहेत. एवढे पाणी कोठेच उपलब्ध नाही. पुण्याजवळ मोठमोठी धरणे आहेत. त्यामुळे पाणी उपलब्धता ही समस्या नाही. पुण्याच्या पाणी वापरात मिटरिंग पद्धत, पाणीवापराला पैसे आकारणी करावी लागेल. पाणी वाटपातील गळती पूर्णपणे बंद करावी लागेल. मापदंडानुसार पाणी वापर आणि काटकसरीने पाणी वापर करावा लागेल. जादा पाणीवापर कमी करायचा असल्यास गेल्या दहा वर्षांपासून केवळ चर्चेत असलेली समान पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी लागेल. पाण्याचे वैयक्तिक मोजमाप झाले झाले पाहिजे. पाण्याचे दर मिटरिंगशी रिलेट केले पाहिजेत. तसेच शहरात वापरलेले पाणी प्रक्रिया करून ते पाणी शेतीला वापरण्यासाठी योग्य करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तसे झाल्यास शहरी आणि ग्रामीण भागात पाण्यावरून सुरू असलेला संघर्षच उद्भवरणार नाही.

पुण्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी देणे हे जलसंपदा विभागाचे काम आहे. १५५ प्रतिमाणशी पाणी दिल्यास पाणी पुरेल. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही धरणे वगळता पुण्याच्या आसपासच्या भागासाठी म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रासाठी पुणे जिल्ह्यातील इतर धरणांमधूनही पाणी घेण्यात येते. पुण्याच्या पाण्याच्या वापराची कार्यक्षमता वाढवावी लागणार आहे. घरात वीज २४ तास उपलब्ध असते. मात्र, वीज देयक जास्त येईल म्हणून आपण घरातल्या खोलीत कोणी नसल्यास दिवे, पंखे आपण स्वत:हून बंद करतो. मग त्याचप्रमाणे आपण नळ बंद करायची काळजी का घेऊ शकत नाही? त्यामुळे आपल्याला उपलब्ध होणाऱ्या पाण्याची काहीतरी किंमत मोजावी लागेल. १०० लिटरला पाच पैसे दर आकारला तरी चालेल. पण अतिरिक्त पाणी वापरल्यास तेवढे पैसे द्यावे लागतील, अशी व्यवस्था आणावी लागेल. तरच पाण्याची किंमत आपल्याला कळेल.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : हेल्दी पुणे, स्मार्ट पुणे

आपण नियोजन करताना शहराला किती पाणी लागते, ग्रामीण भागातील शेतीसाठी किती पाणी लागते. यावर नियोजन ठरते. पुणे शहराला पुरेल एवढे पाणी धरणांत उपलब्ध आहे. स्थानिक पातळीवर पर्जन्य जल पुनर्भरण करून स्वत:साठी भूजल वापरण्याची व्यवस्था तयार करण्याची गरज आहे. तसे झाल्यास स्थानिक पातळीवर पाण्याच्या मोठ्या ग्राहकांकडून ५० टक्के भूजलाचा वापर करता येणे शक्य होईल. पुण्यात पर्जन्य जल पुनर्भरणाचा वापर अतिशय कमी आहे. पाणी शिळे झाले म्हणून फेकून देण्याची आपल्याला सवय आहे. मात्र, धरणांमध्ये पावसाळ्यात पडलेल्या पावसाचे पाणीच साठवून ठेवलेले असते. सध्या फेब्रुवारी महिना सुरू आहे. म्हणजे आता जे आपल्या नळाला पाणी येते, ते धरणात पावसाळ्यात साठवून ठेवलेले पाणी आहे. त्यामुळे पाणी शिळे झाले, ते फेकून द्या. या कल्पना सोडून द्यायला हव्यात.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणेरी सांस्कृतिकपण

खडकवासला ते फुरसुंगी भूमिगत बोगदा हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे दोन मोठे फायदे आहेत. कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे प्रदूषण होते, पाणी गळती होते. ही गोष्ट टाळली जाईल. दोन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी खडकवासला ते फुरसुंगी या दरम्यान वाया जाते. हे दोन टीएमसी पाणी आपण दहा लाख लोकसंख्येला देऊ शकतो. त्यामुळे हा प्रकल्प करणे गरजेचे आहे. हा प्रकल्प झाल्यास दोन टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच कालव्याची मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध होईल. या जमिनीचे चांगल्या प्रकारे नियोजन करून त्याचा वापर करता येऊ शकतो.

मुळशी धरणाचे पाणी पुण्याकडे वळविणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. मात्र, उपलब्ध पाण्याचा चांगला वापर यावर भर दिला पाहिजे. उपलब्ध पाण्यापेक्षा नवीन पाण्याचा स्रोत कसा निर्माण होईल, हेच पुणे महापालिकेचे नेहमी धोरण राहिले आहे. त्याऐवजी जे उपलब्ध पाणी आहे, त्याचा नियमानुसार वापर करायला हवा. पाणीवापराची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने विकसित करण्यावर भर असला पाहिजे. जेवढे पाणी महापालिका वापरते, त्याचे पैसे पालिकेला मोजावे लागतात. त्याशिवाय अधिकचे पाणी वापरल्याबद्दलही जास्त पैसे मोजावे लागतात. तसेच जेवढे पाणी जास्त वापरता तेवढे पाणी नदीत सोडले जाते आणि त्यामुळे प्रदूषणात भर पडते.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : भविष्यवेधी शिक्षण व्यवस्था

कृष्णा खोऱ्यातील पाण्याचे सर्व नियोजन यापूर्वीच झाले आहे. त्यामुळे नवे धरण बांधायला संधी नाही. भीमा खोऱ्यात आधीच तूट आहे. उजनी धरणापर्यंत जेवढे पाणी जाते, तेवढे सर्व पाणी आपण वापरतो. त्यामुळे नवीन धरण बांधता येणे शक्य नाही. त्यामुळे नव्या पाण्याचे स्रोत शोधणे, नवे धरण बांधणे याऐवजी वरील उपाय योजल्यास पुण्याच्या पाण्याचा आता उपलब्ध असलेल्या पाण्यातच प्रश्न मिटेल. पाणी हा आपण स्वत:हून तयार केलेला प्रश्न आहे. त्यामुळे याचे उत्तर महापालिकेलाच शोधावे लागेल.

(लेखक जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव आहेत)

tnmunde@gmail.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We need to find the answer to the water problem in pune dpj
Show comments