पुणे : राज्यात गेल्या पाच – सहा दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर मंगळवारपासून (२७ ऑगस्ट) कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. किनारपट्टी, घाटमाथ्यावर मात्र हलक्या सरींची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व राजस्थानवर असलेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छच्या दिशेने वाटचाल करून उत्तर अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशवरून कमी दाबाचे क्षेत्र पुढे निघून जाताच उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी झाला आहे.
हेही वाचा – ५०० ते ६०० टन ऊस असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ; अजित पवार म्हणाले…
किनारपट्टीवर गुजरातपासून केरळपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय असला तरीही किनारपट्टीवर पुढील चार – पाच दिवस पावसाचा जोर कमी राहील. त्यामुळे घाटमाथ्यावरही पाऊस कमी होणार आहे. दरम्यान, बंगालच्या खाडीत आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याची वाटचाल मध्य प्रदेशाच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय होऊ शकतो.
हवामान विभागाने मंगळवारसाठी (२७ ऑगस्ट) किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि नाशिकला पिवळा इशारा दिला आहे. रायगड आणि पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्याला नारंगी अलर्ट दिला आहे. घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज आहे.
मंगळवारसाठी इशारा
नारंगी इशारा – रायगड, पुणे, साताऱ्याचा घाटमाथा.
पिवळा इशारा – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर.
© The Indian Express (P) Ltd