कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या चार तरुणी चाकण परिसरातून एकाच आठवडय़ात बेपत्ता झाल्या आहेत.
चाकण पोलीस ठाण्याचे अंमलदार नवनाथ सरमाने यांनी याबाबतची माहिती दिली. स्वाती वसंत कोळी (वय २०, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, ता. खेड.), देवता चंद्रकांत दळवी (वय २०, सध्या रा. मेदनकरवाडी, मूळ रा. होडावडा, ता. वेंगुर्ली, जि. सिंधुदुर्ग), शीतल मनसुख पटेल (वय २२, रा. शिक्रापूर रोड, भवानी सॉ मीलमागे, चाकण.) व करिष्मा ईश्वर राठोड (वय २८, रा. खराबवाडी, मराठी शाळेच्या मागे. मूळ रा. गया, ता. मनोरा, जि. वाशिम.) असे बेपत्ता झालेल्या तरुणींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती कोळी ही तरुणी नाणेकरवाडी हद्दीतील मिंडा स्वीच कंपनीत कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडली, मात्र ती माघारी न आल्याने ती बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली. देवता दळवी ही महाळुंगे इंगळे येथील एका कंपनीत कामाला जात होती. डोके दुखत असल्याचे कारण देऊन ती कामाला गेली नाही, मात्र घरातून बाहेर पडून बेपत्ता झाली. शीतल पटेल ही तरुणीही चाकण येथून बेपत्ता झाली आहे. करिष्मा राठोड ही तरुणी खराबवाडी गावच्या हद्दीतील योशिका कंपनीत कामाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली, मात्र ती घरी परतली नाही.
या तरुणींबाबत कोणाला काही माहिती असल्यास संबंधितांनी चाकण पोलीस ठाण्याशी ०२१३५-२४९३३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुशील कदम यांनी केले आहे.