पुणे : राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात तीन दिवसांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या मंगळवार (१५ एप्रिल) ते गुरुवार (१७ एप्रिल) या कालावधीत तक्रारींची जनसुनावणी होणार आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर तीन दिवसांच्या दौऱ्यात शहरातील तक्रारींची सुनावणी मंगळवारी, तर पुणे ग्रामीणसाठी जनसुनावणी बुधवारी घेणार आहेत. या दोन्ही जनसुनावण्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी अकरा वाजता होणार आहेत. गुुरुवारी पिंपरी-चिंचवड महापालिका येथे सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे.

या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव नंदिनी आवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जनसुनावणीला जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणीनंतर महिला आणि बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे, असे चाकणकर यांनी सांगितले.

राज्याच्या महिलांना मुंबईत येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच अन्य कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित रहात असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे महिलांना दिलासा मिळत आहे.’ असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले.