संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखींचे आगमन पुणे शहरात काही वेळात होत आहे. या पालखी सोहळ्यात दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे असंख्य धारकऱ्यांसोबत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होतात. त्यावरून अनेक वेळा वारकरी आणि धारकरी यांच्यात वादाचे प्रकार देखील घडले आहेत. या वर्षी देखील संभाजी भिडे हे पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले आहे. त्यापूर्वी संभाजी भिडे हे शिवाजीनगर भागातील जंगली महाराज येथे आले असून असंख्य धारकरी आहेत.

हेही वाचा – लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले! महिला आणि दोन मुलींचा मृतदेह मिळाला, दोण चिमुकल्यांचा शोध सुरू

हेही वाचा – पोलीस शिपाईच फसला सात लाखांना! प्रकरण काय?

तुकाराम महाराज पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. त्याबाबत काळजी घ्या, तसेच तेढ निर्माण करणारी भाषणे करू नका, अशा स्वरुपाची नोटीस पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना बजवली आहे. असे असतानाही संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. उपस्थित धारकऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी भिडे म्हणाले की, आपल्याला १५ ऑगस्ट रोजी जे स्वातंत्र्य मिळाले ते दळभद्र आणि हांडग स्वातंत्र्य आहे. आपल्याला ते जमत नसून स्वतंत्र हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच, वट सावित्रीच्या पुजेला नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनीदेखील जाऊ नये, असे वादग्रस्त विधानदेखील भिडे यांनी केल्याने नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.