पुण्यामध्ये पहिल्यांदाच फक्त महिलांसाठी वाहतूक सेवा सुरू करण्यात येत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त के. के. ट्रॅव्हल्सतर्फे ‘नारी कॅब’ सुरू करण्यात येत असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी ही सेवा सुरू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या ‘नारी कॅब’च्या चालकही महिलाच असतील.
फक्त महिलांसाठी असलेल्या ‘नारी कॅब’वर काम करणाऱ्या महिला चालकांना दोन महिन्यांचे खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच त्या स्वसंरक्षण करण्यास समर्थ आहेत. गाडय़ांमध्ये सुरक्षिततेसाठी ‘जी.पी.आर.एस.’ प्रणाली बसवण्यात आली आहे. या उपक्रमात ज्येष्ठ महिलांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. नारी कॅबची सेवा महिला दिनापासून (शुक्रवार) सुरू होईल. ही सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि गाडय़ांची खास गुलाबी रंगात सजावट करण्यात आली आहे. हा उपक्रम सुरू करणाऱ्या के. के. ट्रॅव्हल्सचे संचालक केदार कासार यांनी गुरुवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना एकटय़ाने घरी किंवा कामावर जाताना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांनी निर्भयतेने घराबाहेर पडावे, यासाठी ‘नारी कॅब’ महत्त्वाची ठरेल. महिलांनी ९७६७१००१०० या क्रमांकावर संपर्क केल्यास ही सेवा उपलब्ध होईल. नारी कॅबची पुणे-मुंबई-पुणे अशी सेवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

——————

‘ जे जे करीन ते सर्वात उत्कृष्टच असेल…’

समाजकार्याची खूप आवड असूनही निवृत्तीनंतर काम सुरू केलं, तर त्या वयात कामाची उमेद राहणार नाही या जाणिवेतून संसार आणि चरितार्थासाठीचा व्यवसाय चालवतानाच ‘बालरंजन केंद्र’ हा आगळावेगळा उपक्रम माधुरी सहस्रबुद्धे यांनी गेली पंचवीस वर्षे यशस्वीरीतीनं चालवला आहे. या वाटचालीत माधुरीताई म्हणजे सकस पिठं आणि माधुरीताई म्हणजे बालरंजन केंद्र आणि आता माधुरीताई म्हणजे एक दक्ष नगरसेविका असा ठसा अगदी सहजपणे उमटला आहे.
विविध क्षेत्रात काम करताना प्रत्येक ठिकाणी आपली मुद्रा उमटवणं ही तशी कठीण गोष्ट; पण माधुरीताईंना ती सहजसाध्य झाली आहे. त्या द्विपदवीधर तर आहेतच, शिवाय जनसंपर्क, पत्रकारिता, परसबाग-बगिचा, माहितीचा अधिकार अशा विविध विषयांमधील पदविकाही त्यांनी संपादन केल्या आहेत. सकस आणि तयार पिठं तसंच खाद्यपदार्थ, मसाल्याच्या गिरण्या हा त्यांचा चरितार्थाचा व्यवसाय आणि व्यवसाय करत असतानाच पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी ‘बालरंजन केंद्र’ हे एक निराळं काम सुरू केलं. तीन ते चौदा या वयोगटातील मुला-मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी चालणारा हा एक शालेतर उपक्रम आहे. त्यालाच जोडून त्या पालकांसाठी क्रीडामंडळ आणि सुजाण पालक मंडळही चालवतात. आजवर हजारो मुलामुलींनी बालरंजन केंद्रातील उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे आणि सुसंस्कारांचा हा एक अनुकरणीय प्रयोग ठरला आहे.
महापालिकेच्या निवडणूक रिंगणात माधुरीताई गेल्यावर्षी प्रथमच उतरल्या आणि पदार्पणातच नगरसेविकाही झाल्या. तेव्हापासून आलेली ही नवी जबाबदारी देखील मनापासून सांभाळताना त्या नेहमीच दिसतात. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत महापालिकेच्या सभेत बोलताना त्यांची अभ्यासूवृत्तीही वेळोवेळी दिसते. त्यांच्या प्रभागात रस्त्यावर उभे असलेले विनावापरातील खांब आणि त्यांची सद्य:स्थिती याचं सर्वेक्षण त्यांनी स्वत: केलं आणि त्याचा अहवाल जेव्हा महापालिका सभेत त्यांनी मांडला तेव्हा ती माहिती ऐकून सारं सभागृह थक्क झालं होतं. क्रीडा समितीवर काम करताना स्पोर्ट्स नर्सरी सुरू करण्यासाठी त्यांनी केलेल्या सूचनाही उपयुक्त ठरल्या आणि लवकरच या कामाची सुरुवातही होत आहे.
पालक आणि मुलांसाठी आजवर माधुरीताईंनी शेकडो व्याख्याने दिली आहेत, मुलांचा खेळ या विषयावर दोन फिल्म तयार केल्या आहेत, महापालिकेच्या शाळांमध्ये बाल मार्गदर्शक म्हणून काम केले आहे, स्कूल बसचा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे, पाचशेहून अधिक बाहुलीनाटय़ाचे प्रयोग केले आहेत, ‘निर्मळ रानवारा’ मासिकाच्या सल्लागार समितीवरही त्या काम करत आहेत, याशिवाय पुण्यातील अनेक नामांकित संस्थांच्या कामांमध्येही त्या स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत.. माधुरीताईंची ओळख आणखी खूप लांबवता येईल; पण या सगळ्याचं सार एवढंच, की जे जे करीन ते सवरेत्कृष्ट असेल या वृत्तीमुळेच हे सारं घडलं आहे.

                                                                       (शब्दांकन – विनायक करमरकर)
——————

नीलिमाताईंनी दिले आनंदाचे ‘नवक्षितिज’

पुण्यासारख्या शहरात विशेष मुलांची संख्या सुमारे दोन हजार आहे. या मुलांना समाजाने सामावून घेण्याची जेवढी गरज आहे, त्याबरोबरच या मुलांना सुयोग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आरोग्यपूर्ण व आनंदी आयुष्य जगायला मिळावे, यासाठी संघटनात्मक काम देखील आवश्यक आहे आणि त्यासाठीच जाणीवजागृतीबरोबरच अशा मुलांसाठी काम करणाऱ्या डॉ. नीलिमा देसाई यांची ओळख महिला दिनाच्या निमित्ताने आवर्जून करून द्यायला हवी.
हिंजवडी जवळ असलेल्या मारुंजी येथे ‘नवक्षितिज’ या संस्थेच्या माध्यमातून प्रौढ विशेष मुलांच्या पालकांना केवळ दिलासाच नाही, तर या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंद देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून डॉ. देसाई गेली दहा वर्ष सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे आज केवळ छत्तीस मुलांचेच नाही, तर त्यांच्यामुळे त्या मुलांच्या पालकांचे, भाऊ-बहिणींचे देखील पुनर्वसनच झाले आहे. त्या विशेष मुलांचे कुटुंबीय आता आपला पाल्य सुयोग्य संस्थेत त्याच्यासारख्याच मुलांबरोबर वाढतोय आणि समाजही त्याचा स्वीकार करतोय, या विश्वासाने मोकळा श्वास घेऊ शकताहेत.
आपल्या विशेष मुलीच्या, आदितीसारख्या मुलांसाठी ‘नवक्षितिज’ ही संस्था डॉ. देसाई यांनी २००३ मध्ये सुरू केली. पती डॉ. चंद्रशेखर आणि त्यांच्या कार्याला खंबीर पाठिंबा देणाऱ्या वसुधा दिवेकर यांच्या साथीने त्यांनी ही विशेष मुलांची संस्था सुरू केली. सुरुवातीला आदिती आणि आणखी एक विद्यार्थी, दोन मदतनीस आणि एका खोलीत सुरू झालेल्या या संस्थेत आता छत्तीस विद्यार्थी असून या मुलांसाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले तीन शिक्षक देखील आहेत. ट्रेकिंग आणि वेगवेगळ्या स्पर्धामध्ये या मुलांनी सहभाग घ्यावा म्हणून त्यांना प्रोत्साहन देणे तसेच मुलांना समाजाने सामावून घ्यावे या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी पथनाटय़े, वाहतूक नियंत्रणासारखे कार्यक्रम करणे या डॉ. देसाई यांच्या कल्पना आणि त्या चांगल्याच यशस्वी देखील झाल्या आहेत.
‘नवक्षितिज’ या समाजाभिमुख संस्थेमार्फत विशेष मुलांसाठी असणाऱ्या संस्थांची गरज लक्षात घेऊन मारुंजीपासून सात कि.मी.अंतरावर कुसगाव येथे साठ विशेष मुलांसाठी चार कोटींच्या एका प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. विशेष मुलांना समाजात सामावून घेतले जावे या उद्देशाने डॉ. देसाई यांच्यामार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांना आजपर्यंत समाजाने दिलेली साथ मौलिक असून पुढेही मिळणारी साथ या मुलांसाठी एक नवी पहाट घेऊन येईल, असा विश्वास त्यांना वाटतो. त्यांचा हा प्रकल्प प्रौढ विशेष मुलामुलींसाठी काम करणाऱ्यांना, त्यांच्यासाठी संस्थांची उभारणी करण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठीही निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे.

                                                                       (शब्दांकन – श्रीराम ओक)
——————
 
जोडप्यांना आहे दत्तक मुलीची प्रतीक्षा!

गेल्या पाच वर्षांत मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण लक्षणीय रीत्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. ‘सोफोश’ या संस्थेत सध्या ब्याऐंशी जोडप्यांनी मूल दत्तक घेण्यासाठी नोंदणी केली असून यांतील सदतीस जोडपी केवळ मुलीची प्रतीक्षा करीत आहेत, तर तीस जोडप्यांची मुलगा किंवा मुलगी यातील कोणतेही बालक दत्तक घ्यायची तयारी आहे. केवळ पंधरा जोडप्यांना मुलगाच दत्तक हवा आहे.
संस्थेच्या दत्तकविधान समन्वयक संगीता पवार यांनी ही माहिती दिली. इतकेच नव्हे तर ‘सिंगल पॅरेंट’ महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही बदलत असून मुलींना दत्तक घेणाऱ्या एकटय़ा महिलांचा सामाजिक संघर्ष कमी होत असल्याचे निरीक्षणही पवार यांनी नोंदविले. पवार म्हणाल्या, ‘‘साधारणपणे दहा वर्षांपूर्वी मूल दत्तक घ्यायला जी जोडपी येत असत, त्यांच्या घरची वयस्क मंडळी मुलगाच दत्तक घेण्याचा आग्रह धरीत. हळूहळू या मानसिकतेत बदल होत गेल्याचे दिसून येत आहे. आता जोडपी आपणहून मुलगी दत्तक घेण्यासाठी येतात. पालक आणि मुलगी यांच्यातील नाते खूप घट्ट असते. मुलीला वाढविणे, तिची हौसमौज करणे यांत आई-बाबांना अधिक आनंद मिळतो. मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या एकटय़ा महिलांना मुलगीच दत्तक दिली जाते. अशा प्रकारचे पहिले दत्तकविधान संस्थेने पंचवीस वर्षांपूर्वी केले होते. या पंचवीस वर्षांत एकटय़ा मातांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनातही सकारात्मक बदल झाल्याचे दिसते. आता संस्थेतर्फे वर्षांला अशी दोनतीन दत्तकविधाने केली जातात.’’
राहुल आणि सायली शिवरकर या जोडप्याने ‘सारा’ या अडीच महिन्यांच्या मुलीला नुकतेच दत्तक घेतले आहे. राहुल शिवरकर म्हणाले, ‘‘जेव्हा आम्ही मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा घरात पहिली मुलगीच हवी, अशी आमची भावना होती. मुलगा-मुलगी अशा भेदभावाची परिस्थिती आमच्या घरात नसल्याने वयस्क मंडळींनीही आमचा निर्णय आनंदाने स्वीकारला. मुलीशिवाय कुटुंब पूर्णच होऊ शकत नाही!’’  
 
गेल्या पाच वर्षांत ‘सोफोश’तर्फे झालेली दत्तकविधाने

वर्ष         मुली        मुलगे
२००८       ४६         ३०  
२००९       ४१         २३
२०१०       ३९         ३९
२०११       ४३         ४२
२०१२       ४५         ३५

                                                                               ( शब्दांकन – संपदा सोवनी)
———————