Anarsa recipe marathi: दिवाळी म्हंटलं की दिवे, आकाशकंदील, विविध रंगांच्या रांगोळी या सगळ्या गोष्टी तर डोळ्यांसमोर येतातच पण त्याआधीच खवय्येप्रेमी आतुरतेने वाट पाहतात ती खमंग फराळाची. दिवाळीत लाडू, चकली, करंजी असे कितीतरी फराळांचे पदार्थाची चव आपल्या जीभेवर तरळू लागते. अशातच याआधी आपण दोन रेसिपी पाहिल्या आहेत, एक करंजीची आणि दुसरी शंकरपाळ्या. आज आम्ही तुमच्यासाठी नवी रेसिपी घेऊन आलो आहोत. दिवाळीसाठी १/२ किलो तांदुळापासून बनवा जाळीदार नी हलके अनारसे. चला तर याची तांदूळ भिजवण्यापासून तळण्यापर्यंतची सोपी रेसिपी पाहुयात.

अनारसे साहित्य

१/२ किलो बासमती तुकडा तांदूळ
४०० ग्रॅम गूळ
४ टीस्पून खसखस
तळण्यासाठी तेल

अनारसे कृती

स्टेप १

इथे बासमती तुकडा हा तांदूळ अनारशासाठी वापरला आहे. त्यामुळे अनारशांना चव खूप छान येते. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कोणताही जाडा तांदूळ इथे अनारशासाठी वापरू शकता. प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन तीन दिवस भिजत घालणे. त्यातील पाणी रोज बदलून घेणे. चौथ्या दिवशी चाळणीवर दहा मिनिटे तांदूळ निथळत ठेवावे त्यानंतर वीस मिनिटे सुती कापडावर वाळत घालावे.थोडे ओलसर असतानाच मिक्सरमधुन बारिक वाटावे.

स्टेप २

यानंतर मैदा चाळतो त्या बारीक चाळणीने चाळून घ्यावे. तांदूळ मिक्सरमधून बारीक करून चाळणीने सारखे चाळून घ्यावा. त्यामुळे अनारशाचं बारीक पीठ तयार मिळते. एकदम थोडी कणी राहील तोपर्यंत मिक्सरमधून तांदूळ बारीक वाटून घ्यावे. अनारशाचं पीठ तयार झाल्यावर त्यामध्ये किसलेला गूळ मिक्स करून घ्यावा त्यानंतर ते मिश्रण मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यावे. त्यामुळे गूळ आणि तांदळाचे पीठ व्यवस्थित मिक्स होते. आणि गोळाही व्यवस्थित मळता येतो.

स्टेप ३

गोळा घट्ट मळल्यानंतर डब्यामध्ये चार ते पाच दिवस मुरण्यासाठी ठेवून द्यावे. (प्लास्टिकचा डबा वापरावा किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी डब्यात ठेवावी.)

स्टेप ४

तळण्यासाठी आता पीठ बाहेर काढून घ्यावे. एका कढईत तेल गरम करावे. मळलेल्या गोळ्याचे आता छोटे छोटे गोळे करावे. हाताला थोडे तेल लावून गोळा हातावर थोडासा चपटा करून घ्यावा त्यानंतर एका ताटात किंवा पोळपाटावर खसखस पसरून घ्यावी त्यावर तो चपटा गोळा ठेवून बोटांना तेल लावून बोटांनी एकसारखे सरकवत त्याची पुरी बनवून घ्यावी.

स्टेप ५

कढाईत तेल थोडेच घ्यावे आणि तळताना एकच अनारसा एकावेळी तळावा. तळताना पुरीची बाजू बदलू नये, नाहीतर खसखस करपेल. पुरी तेलात तळताना जास्त हलवू नये. झाऱ्याने पुरीवर तेल उडवावे त्यामुळे त्याला वरून छान जाळी पडते. मध्यम आचेवर ठेवून पुरी छान लालसर तळून घ्यावी. तळल्यावर अनारसे चाळणीत ठेवून घ्यावे आणि तेल चांगले अनारशातून नितळून घ्यावे.

हेही वाचा >> दिवाळीसाठी १/२ किलोच्या प्रमाणात तोंडात विरघळणारी नानकटाई; दिवाळीच्या फराळातली खास रेसिपी

टीप

मळलेले मिश्रण (पीठ) खूप दिवस टिकून राहते. त्यामुळे तळताना जर अनारसे फेसाळले तर पीठ तसेच ठेवून काही दिवसांनी तळावे.

तांदळाच्या पिठामध्ये गूळ मिक्स करताना ४०० ग्रॅम गूळ वापरला आहे. पण कधी कधी पीठ मळताना गुळ थोडा जास्तही लागू शकतो याचा अंदाज घेऊन घट्ट गोळा मळून घ्यावा.

कधी कधी पीठ उष्णतेने सैलसर झाले तर पीठ फ्रिज मध्ये ठेवावे. अनारसे बनवताना थोडेसे तांदळाचे पीठ टाकून मळून अनारसे लगेच करून घ्यावेत. अनारसे व्यवस्थित होतात.

खूप अप्रतिम चवीचे अनारसे तयार होतात. नक्की करून बघा