आपल्या रोजच्या आहारात खाल्ल्या जाणाऱ्या तांदूळ किंवा भाताला पूर्णान्न म्हटले जाते. कोणत्याही विशेष गोष्टींची आवश्यकता नसणारा आणि अगदी काही मिनिटांत तयार होणारा भात प्रत्येक भारतीयाचा आवडता पदार्थ आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. भात खाल्ल्याशिवाय आपले जेवण पूर्णच झाले नाही असेही अनेकांना वाटते. जेव्हा आपण स्वयंपाक करायला शिकत असतो, तेव्हा सर्वात पहिले आपली आई आपल्याला भात बनवण्यास शिकवते. कारण तो तयार करण्यासाठी काहीही कष्ट नसून शिकण्यास अगदी सोपा असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही अगदी पहिल्यांदाच स्वयंपाक करणार असाल किंवा वर्षानुवर्षे करत असाल, तरीही या अगदी सोप्या परंतु तितक्याच महत्वाच्या अशा पाच टिप्स कायम लक्षात ठेवायला हव्यात. यामुळे भात गिचगिचीत किंवा फडफडीत होणार नाही. मग काय आहेत या टिप्स आणि ट्रिक्स पाहा.

१. तांदूळ धुणे

बाजारातून आणलेले तांदूळ अनेक जण न धुता किंवा एकदाच धुवून वापरतात. मात्र, तांदूळ नीट न धुतल्याने तो शिजत असताना त्यामधील अतिरिक्त स्टार्च पाण्यावर येऊन भाताला चिकट बनवतो. असे होऊ नये यासाठी भात शिजवण्याआधी तांदूळ किमान तीन ते चार वेळा थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे तो मऊ आणि हलका होण्यास मदत होईल, अशी माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखावरून समजते.

हेही वाचा : किचन टिप्स : घरातील ‘या’ अन्नपदार्थांचे आयुष्य वाढवा; पाहा ‘हे’ पाच सोपे, उपयुक्त आणि घरगुती उपाय…

२. पाण्याचे प्रमाण

तांदूळ शिजत असताना त्यामध्ये किती पाणी घातले जात आहे हे अत्यंत महत्वाचे असते. तांदूळ धुवून झाल्यानंतर तो पातेल्यात किंवा कुकरमध्ये शिजवण्याआधी त्यामध्ये घातले जाणारे पाणी हे योग प्रमाणातच असायला हवे. जर तांदुळाचे दाणे लांब असतील तर त्यास पाण्याचे साधारण २:१ असे प्रमाण घेतले जाते. मात्र, प्रत्येक तांदळासोबत हे प्रमाण बदलते. जर दाणे हे लांब असतील तर २:१ असे पाण्याचे प्रमाण असेल; मात्र लहान कणीच्या तांदुळासाठी जास्त पाणी लागू शकते. परंतु, गोंधळून जाऊ नका. यासाठी तुम्ही एक अतिशय सोपी आणि वर्षानुवर्षे शिकवली जाणारी ट्रिक वापरू शकता. धुतलेला तांदूळ पातेल्यात/कुकरच्या भांड्यात टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्या बोटाची दीड ते दोन पेरं बुडतील इतके पाणी घालून शिजवला जाऊ शकतो.

३. पांढरा आणि लाल भात शिजवणे

तुम्ही जर लाल तांदूळ खात असाल तर त्याला पांढऱ्या भाताप्रमाणे शिजवू नका. कारण हे दोन्ही तांदूळ आणि त्यांचे गुणधर्म वेगळे असल्याने त्यांच्या शिजवण्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे पांढरा भात शिजवताना तुम्ही जितके पाणी तांदुळात घालत असाल, त्यापेक्षा १/४ किंवा १/२ पट अधिक पाणी लाल भात शिजवताना घालावे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे, आपल्या साध्या भाताला शिजण्यासाठी साधारण १५ ते २० मिनिटे लागत असतात; मात्र लाल भात शिजण्यासाठी जवळपास ५० मिनिटं ते एक तास इतका वेळ लागू शकतो.

४. भात मोठ्या आचेवर शिजवणे

स्वयंपाक भरभर व्हावा यासाठी अनेकांना अन्न मोठ्या आचेवर शिजवण्याची सवय असते. मात्र, यामुळे पदार्थ बिघडू शकतो, कच्चा राहू शकतो किंवा त्याला योग्य ती चव येत नाही. असेच जर तुम्ही भातासोबत केलेत, तर तांदूळ पूर्णपणे शिजण्याआधीच त्यातील पाणी आटून भात कच्चा राहण्याची शक्यता असते. हे होऊ नये यासाठी सर्वप्रथम पाणी उकळून त्यामध्ये धुतलेला तांदूळ घालावा, यामुळे सर्व शीतं व्यवस्थित शिजण्यास मदत होईल.

हेही वाचा : स्वयंपाकघरात एकही झुरळ दिसणार नाही; घरातील उदबत्त्या अन् कापूर करतील तुमची मदत! पाहा ही सोपी हॅक….

५. ताबडतोब खाण्यास घेणे

तुम्हाला कितीही भूक लागलेली असूदे, ही स्टेप अजिबात वगळू नका. आपला भात शिजून तयार झाल्यानंतर तो ताबडतोब खाण्यासाठी वाढून घेऊ नका. त्याऐवजी, किमान ५ ते १० मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवावे आणि त्यानंतर खाण्यास घ्या. असे केल्याने भाताची शिते अधिक मऊ होतात आणि त्याची चव वाढण्यासही मदत होते.

त्यामुळे पुढच्या वेळेस अशा पद्धतीने मऊ भात नक्की बनवून पाहा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to cook perfect rice use this simple tips and tricks avoid making silly mistakes dha
Show comments