[content_full]
…तरीही विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो काटेकुटे तुडवत, झुडपं बाजूला करत, अंधाराची तमा न बाळगता पुन्हा स्मशानाकडे गेला. झाडावर टांगलेले प्रेत त्याने खांद्यावर घेतले आणि वाटचाल करू लागला. त्याच वेळी खांद्यावरच्या प्रेतामधला वेताळ जागा होऊन त्याच्याशी बोलू लागला. वेताळ म्हणाला, राजा, तुझी ही ध्येयनिष्ठा आणि तिखट वृत्ती पाहून मी तुला झणझणीत नागपुरी वडाभाताची रेसिपी सांगतो. विक्रमादित्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, “अरे, लगेच डायरेक्ट तात्पर्य? दरवेळी तू आधी गोष्ट सांगतोस, मग माझ्या डोक्याची शकलं होण्याची धमकी देतोस, मग माझ्याकडून चतुराईनं उत्तर वदवून घेतोस आणि मग कल्टी मारून पुन्हा झाडावर लटकायला जातोस. आज हा अचानक उलटा पवित्रा?“ वेताळ गडगडाटी हसला. म्हणाला, “राजा, तू फसलास. तू बोलावंस, यासाठीच ही युक्ती केली होती. तू बोललास आणि हा मी निघालो…!“ विक्रमादित्य त्याच्या दुप्पट गडगडाटी हसला आणि त्याला म्हणाला, मला उत्तर माहीत असतानाही मी बोललो नाही, तर माझ्या डोक्याची शंभर शकलं होतील, अशी धमकी वगैरे तू दिलीच नव्हतीस. असं चीटिंग नाही करायचं. चल, गोष्ट सांग. आता वेताळाचाही नाइलाज झाला. तो म्हणाला, दरवेळी तुझ्यासाठी कुठली गोष्ट आणायची? राजा हसून म्हणाला, तुझं बायकांसारखंच आहे. त्यांनाही रोज सकाळी उठल्यावर आज कुठली भाजी करायची, हा प्रश्न पडतो. सांग कुठलीतरी! वेताळही ऐकणार नव्हता. “कुठलीतरी कशी? नवरेही असंच `कर कुठलीही!` सांगतात आणि मग त्यांच्या नावडीची भाजी असेल, तर `हे काय? आजसुद्धा वांगं? दुसऱ्या भाज्याच मिळत नाहीत का तुला?` हे असलं काहीतरी ऐकून घ्यावं लागतं. वाद वाढायला नको, म्हणून वेताळानं एका नागपुरी तरुणीची गोष्ट सांगितली. तिनं बऱ्याच मेहनतीनंतर केलेला तो पदार्थ म्हणजे नागपुरी वडाभात, हे विक्रमानं ओळखलं आणि मग या प्रसंगाच्या शेवटीही पुन्हा ते नेहमीसारखंच सगळं घडलं.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- वड्यांसाठी
- ३ वाट्या तांदूळ,
- १ वाटी मोड आलेली मटकी, २ वाट्या हरबऱ्याची डाळ, १ वाटी तुरीची डाळ, पाऊण वाटी उडदाची डाळ
- मिरच्या, थोडे लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, धने-जिरे पूड, लसूण, कोथिंबिर, कढीपत्ता, मीठ, फोडणीसाठी तेल. (हळद घालू नये)
- भातासाठी
- दोन वाटया तांदळाचा मोकळा फडफडीत भात
- तेल
- फोडणीचं साहित्य
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- सर्व डाळी रात्री भिजत घालून सकाळी जाडसर वाटाव्या. मटकीही जाडसर वाटून घ्यावी.
- मिरची-लसूण जाडसर वाटाव्यात. सर्व साहित्य वाटलेल्या डाळीत घालावे आणि सर्व एकजीव करावे. वाटलेल्या डाळीचे छोटे-छोटे चपटे वडे थापून गरम तेलात तळून काढावे.
- नंतर २ वाटया तांदळाचा साधा मोकळा भात करून घ्यावा. ज्या तेलात वडे तळले तेच तेल गरम करायला ठेवावे. प्रत्येकाला पानावर भात वाढला की ४-५ वडे कुस्करून घालावे.
- मोहरी , हिंग , हळद घालून तेलाची फोडणी भातावर घालावी . जास्त तिखट खाणार्यांनी वरील तेलात ४/६ मिरच्या घालून तेल भातावर घ्यावे.
- या भाताबरोबर (साखर न घालता) ताकाची कढी करावी.
[/one_third]
[/row]