‘मिसळ’ हा मराठी खाद्यसंस्कृतीतील असा एक पदार्थ आहे; जो प्रदेशानुसार आपली चव आणि रूप बदलतो. सकाळच्या न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही आणि कुणालाही खायला आवडणारा पदार्थ म्हणूनही तो अलीकडे नावारूपाला आलाय. पण मिसळ हा केवळ पदार्थ नसून त्या प्रदेशातील खवय्यांसाठी त्यांचा अभिमान असतो. कोल्हापूर, नाशिक किंवा नगरमधील ‘मिसळ’चे कट्टर चाहते तर मिसळीबद्दल बोलताना कधी कधी प्रेमापोटी आक्रमकही झालेले पाहायला मिळतात. अशीच एक अभिमान बाळगण्यासारखी आणि जरूर चाखावी अशी मिसळ मुंबईतही मिळते हे तुम्हाला ठाऊक आहे का? ‘मारुतीराव मिसळवाले’ या नावाने आणि ‘अस्सल मराठी चव’ या टॅगलाइनने ती मुंबईकरांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतेय.

मारुतीराव नागोजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी कमलाबाई यांनी १९८३ साली अहमदनगरच्या मुख्य पोस्ट ऑफिसजवळ एक उपाहारगृह सुरू केलं. त्या उपाहारगृहातील मुख्य पदार्थ होता मिसळ. अल्पावधीतच ही मिसळ नगरकरांच्या चर्चेचा विषय बनली. कारण या मिसळीचं वैशिष्टय़ म्हणजे मिसळीसोबत पाव नाही तर पुऱ्या दिल्या जात होत्या. स्वत:च्या शेतात पिकवलेल्या गव्हापासून तयार केलेलं पीठ पुरीसाठी वापरलं जात असे. त्यामध्ये कुठलीही भेसळ नसल्याने त्या गव्हाला एक वेगळी चव होती. त्यामुळे नगरकर ‘मिसळपाव’ या पारंपरिक जोडीला छेद देणाऱ्या नावीन्यपूर्ण ‘मिसळपुरी’ या संकल्पनेच्या प्रेमात पडले.

मिसळीचं वेगळेपण इथंच संपलं नव्हतं, तर त्यामध्ये वापरले जाणारे घटक पदार्थही वेगळे होते. मिसळीत फरसाणऐवजी कडक बुंदी आणि मध्यम जाडीची पिवळी शेव वापरली जाते. ही शेव बाजारातून विकत न आणता मारुतीरावांच्या उपाहारगृहातच तयार केली जाते. शिवाय मटकीचा रस्सा तयार करण्यासाठी वापरला जाणारा मसाला आणि तिखट मसालादेखील ते स्वत: तयार करतात. सोबतीला बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि वर भुरभुरलेली कोथिंबीर आहेच. या सगळ्यामुळे मारुतीरावांची मिसळ ही वेगळी ठरते.

मारुतीरावांची मिसळ मुंबईत येण्यालाही एक वेगळं निमित्त पडलं. मारुतीरावांचे नातू राहुल खामकर कामानिमित्त आपल्या पत्नीसोबत मुंबईला येत असत. तेव्हा त्यांनी विविध ठिकाणच्या मिसळी चाखून पाहिल्या. मुंबईतील मराठी हॉटेलांमध्ये मिसळ मिळत असली आणि ती इथल्या लोकांना आवडत असली तरी एकही मिसळ राहुल यांच्या पसंतीस उतरली नाही. आणि मारुतीरावांच्या मिसळीला मुंबईत यायला कारण मिळालं. पण मुंबईत येताना राहुल यांनी आपल्या मिसळीचा ‘मारुतीराव मिसळवाले’ हा ब्रॅण्ड तयार केला. दादर आणि लालबाग येथे राहणारा मराठी माणूस आणि आता याच भागात मोठय़ा प्रमाणात कॉर्पोरेटमध्ये काम करणारा तरुण वर्ग यांना टार्गेट करून राहुल यांनी लोअर परेल भागात मुंबईतील आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.

मारुतीरावांचे नगर येथे दोन, नगर-पुणे रोडवर आणि मुंबईतील लोअर परेल येथे एक असे चार आऊटलेट आहेत. या सर्व आऊटलेटला नगरवरूनच कच्चा माल पुरवला जातो हे विशेष. त्यामुळे प्रत्येक आऊटलेटमध्ये मिसळीची चव सारखीच लागते. बुंदी आणि शेव तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारचं बेसन, पुऱ्यांसाठी गावाकडील शेतात पिकवलेल्या गव्हाचं पीठ, रश्शासाठी गावरान मटकी आणि ती बनण्यासाठी पितळेची भांडी यामुळे मारुतीरावांची मिसळ इतर मिसळींच्या तुलनेत जरा जास्तच भाव खाऊन जाते.

राहुल यांनी व्यवसायाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आणि मिसळ एक ब्रॅण्ड म्हणून प्रस्थापित केल्यानंतर त्यात वेगवेगळे प्रयोगही केले आहेत. मिसळीचेही वेगवेगळे प्रकार येथे आहेत. इथे चीज, पनीर आणि दही-मिसळही मिळते. पनीर मिसळीत पनीरचे बारीक तुकडे तव्यावर फ्राय करून मिसळीमध्ये टाकले जातात. तर चीज-मिसळमध्ये सर्वात शेवटी वर चीज किसून मिसळ सव्‍‌र्ह केली जाते. र्ती वडा, रस्सा पुरी, श्रीखंड आणि आम्रखंड पुरी हे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. पालक, बटाटा आणि कांदा भजीसुद्धा साध्या आणि चीज स्वरूपातही मिळतात. शिवाय कोथिंबीर वडी आणि साबुदाणा खिचडी आवर्जून खाण्यासारखी आहे. मेन्यूमध्ये खाण्याच्या पदार्थासोबत पिण्यासाठी लस्सी, पीयूष, ताक, कोकम सरबत, वेगवेगळ्या फळांचे ज्यूस, मिल्कशेक असल्याचंही दिसतं. पुण्याची स्पेशल ड्रायफ्रूड आणि मँगो मस्तानीदेखील मेन्यूच्या शेवटी पाहायला मिळते.

मारुतीराव मिसळवाले

कुठे – शॉप क्रमांक ३, खटिजाभाई मॅन्शन, दीपक टॉकीजजवळ, पी.बी. मार्ग, लोअर परेल.

@nprashant

nanawareprashant@gmail.com

Story img Loader