Mistakes While Making Homemade Pickle: सध्या उन्हाळा सुरु आहे. उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे आंबा. या तीन महिन्याच्या काळात आंबा आणि आंब्यांपासून तयार केलेले पदार्थ मोठ्या चवीने खाल्ले जातात. उन्हाळ्यामध्ये पिकलेल्या आंब्यासह कच्चा आंबा म्हणजेच कैरीदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. तेव्हा कैरीचे पन्हं, लोणचं असे पदार्थ बनवले जातात. लोणचं तयार करण्यासाठी आवश्यक स्थिती उन्हाळ्यात असते. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये लोणचं या पदार्थांला खूप महत्त्व आहे.
आजकाल बाजारांमध्ये रेडीमेड लोणचं मिळत असलं, तरी घरी बनवलेल्या लोणच्याची चव काही औरच असते. कैरी व्यतिरिक्त अन्य पदार्थांपासूनही लोणचं बनवले जाते. लोणचं तयार करण्याची प्रक्रिया खूप मोठी असते. यामध्ये वेळ आणि मेहनत लागू शकते. अशा वेळी काही किरकोळ चुकांमुळे घेतलेले कष्ट वाया जाऊ शकतात आणि लोणचं खराब होऊ शकते. लोणचं बनवताना आणि साठवून ठेवताना कोणत्या गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक असते याची माहिती आम्ही देणार आहोत.
ताज्या पदार्थांचा वापर करणे.
कैरी, लिंबू, मिरची अशा पदार्थांपासून लोणचं तयार केले जाते. साहित्यातील या मुख्य पदार्थासह अन्य पदार्थ वापरले जातात. लोणचं बनवताना लागणारे साहित्य ताज्या स्वरुपामध्ये असणे आवश्यक असते. त्यासह त्यांची गुणवत्ता चांगली असावी. असे नसेल तर लोणच्याची चव बिघडू शकते. लोणचं बनवताना लागणारे मसाले ताजे नसल्यास लोणच्याचा मसाला आणि तेल यांचा रंग बिघडू शकतो. शिवाय ते लवकर खराब होऊ शकते.
सर्व साहित्य योग्य प्रमाणात वापरणे.
लोणच्याला आंबटपणा यावा यासाठी मिश्रणामध्ये लिंबाचा रस टाकला जातो. जर हा रस योग्य प्रमाणात नसेल, तर लोणचं जास्त आंबट होण्याची शक्यता असते. लिंबाच्या रसाप्रमाणे तेल आणि मीठ हे देखील अचूक प्रमाणामध्ये वापरणे आवश्यक असते. या दोन पदार्थांमुळे लोणचं जास्त दिवसांसाठी टिकून राहते. यांच्या प्रमाणामध्ये गडबड झाल्यास लोणच्याची चव बिघडू शकते. योग्य प्रमाण नसल्यास हा पदार्थ दिर्घकाळ टिकत नाही.
लोणचं पूर्णपणे तयार होऊ न देणे.
आंबट-गोड लोणचं बऱ्याचजणांना प्रिय असते. अनेकदा घरी लोणचं बनवताना लोक ते पूर्णपणे तयार होऊ न देत नाहीत. लोणचं तयार होण्यासाठी ठराविक काळ जावा लागतो. हा काळ पूर्ण न झाल्यास लोणच्याला चव राहत नाही, ते जास्त दिवस टिकून राहत नाही.
आणखी वाचा – आमरस काळा पडू नये यासाठी ‘या’ ट्रिक्सची घ्या मदत; आंब्याचा सीझन संपल्यावरही खा रसाळ आमरस
चुकीच्या भांड्याची निवड करणे.
लोणचं तयार करताना काचेच्या भांड्याचा वापर करु नये. याव्यतिरिक्त तांबे, पितळ, जस्त अशा धातूंच्या भांड्यामध्ये लोणचं तयार करणे टाळावे. या भांड्यांमुळे लोणच्याची चव बिघडून ते कडू होऊ शकते.
(येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.)