अनेकदा आयुष्यात जे हवं असतं त्याच्या मागे आपण इतके पळत जातो की आवडती गोष्ट नाही मिळाली तर जगूच शकणार नाही, असा ग्रह होऊन बसतो. त्यामुळे ती गोष्ट हातून निसटून जाऊ नये याचा आटोकात प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असते. पण आपल्याला आवडणारी गोष्ट इतर पर्यायांनीही मिळवता येऊ शकते हे मानायला आपलं मन आणि बुद्धी तयार नसते अशावेळी काय करावं, याची उकल ‘टीटीएमएम’ म्हणजे ‘तुझं तू माझं मी’ हा सिनेमा बघताना होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या लग्न करायचं नाही आणि एकदा का लग्न केलं तर बंधनात अडकू या विचाराने जय म्हणजेच ललित प्रभाकर ऐन लग्नातून पळून जातो तर दुसरीकडे राजश्री म्हणजे नेहा महाजनही लग्न ठरलंय म्हणून घरातून पळून जाते. योगायोगाने जय आणि राजश्री सह-प्रवासी बनतात. प्रवासादरम्यान त्यांच्यात भांडणं होतात, नंतर मैत्री होते आणि नंतर पुन्हा भांडण होतात. पुण्यातून सुरू झालेला हा प्रवास गोव्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि परत पुण्यात येऊनच थांबतो. या मधल्या प्रवासात त्यांना लग्नाचं नाटक करावं लागतं. यात दोघांच्याही मनाविरुद्ध त्यांचं खरंखुरं लग्नही होतं. पण गोव्यातलं लग्न गोव्यातच राहील हा विचार करुन ते दोघंही गोव्यात आयुष्य एन्जॉय करत असतात. पण या दरम्यान दोघांचेही घरातले त्यांना शोधत गोव्यापर्यंत पोहोचतात. त्यांचं लग्न झालेलं पाहून त्यांनाही मोठा धक्का बसतो. पण त्यांना लग्न का करावं लागतं. नंतर त्या लग्नाचं काय होतं आणि नंतर ते खरंच एकत्र राहतात का हे जाणून घेण्यासाठी टीटीएमएम हा सिनेमा एकदा तरी पाहावा असा आहे.

सिनेमा पाहताना आपण फार काही नवीन किंवा वेगळं पाहतोय असं वाटत नाही. पण एक हलका फुलका सिनेमा म्हणून टीटीएमएमकडे नक्कीच पाहिले जाऊ शकते. फार फाफड पसारा न लावता हा सिनेमा लवकर संपतो. पुर्वार्ध जेवढा रंगत जातो तेवढाच उत्तरार्ध संथ वाटतो. त्यामुळे सिनेमा संपताना अनेक गोष्टी अर्धवट सुटल्या असे वाटत राहते. याशिवाय दिग्दर्शक कुलदीप जाधव याला अनेक गोष्टी सांगायच्या होत्या, पण त्या नीट मांडता आल्या नाहीत असे वाटत राहते.

या सिनेमात सह-कलाकारांची फौजही भारी आहे. विद्याधर जोशी, सविता मालपेकर, सतीश पुळेकर, सीमा देशमुख, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे या प्रत्येकाच्याच व्यक्तिरेखा लक्षात राहणाऱ्या आहेत. पण त्यातही सिनेमात जी काही विरंगुळेची जागा हे त्यात एकतर सागर कारंडे दिसतो किंवा बालकलाकार पुष्कर लोणकर. पुष्करचा अभिनय आधीच्याही सिनेमांमधून दिसण्यात आला आहे. पण या सिनेमात त्याचा योग्य तो वापर करण्यात नाही आला असंच म्हणावं लागेल. जय- राजश्री म्हणजे ललित आणि नेहा यांची चांगली केमिस्ट्री सिनेमात दिसते. ललित जितका सहज वावरताना दिसतो तेवढी नेहा दिसत नसली तरी दोघांची मेहनत सिनेमा बघताना नक्कीच दिसून येते.

सिनेमाचा काही भाग गोव्यात चित्रीत करण्यात आल्यामुळे सिनेमा पाहताना गोव्याचं ओझरतं दर्शन घडतं. पण सिनेमॅटोग्राफी अजूनही चांगली होऊ शकली असती हे मात्र नक्की. सिनेमातील काही गाणी चांगली आहेत. सिनेमात कोणत्याच ठिकाणी अतिशयोक्ती दिसत नाही, हे या सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. एका लयीत सिनेमा पुढे सरकत जातो आणि तसा तो संपतो.

सिनेमा- टीटीएमएम- तुझं तू माझं मी

दिग्दर्शक- कुलभूषण जाधव

कलाकार- ललित प्रभाकर, नेहा महाजन, विद्याधर जोशी, सविता मालपेकर, सतीश पुळेकर, सीमा देशमुख, भारत गणेशपुरे, पुष्कर लोणकर, सागर कारंडे

– मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@indianexpress.com

मराठीतील सर्व चित्रपट समिक्षण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalit prabhakar neha mahajan starrer ttmm tujha tu majha mi marathi movie review