भारतातल्या उपाहारगृहांची वार्षिक उलाढाल चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. म्हणजे, जीडीपीच्या जवळपास दोन टक्क्यांपेक्षा जास्त. उपाहारगृहांवर पूर्वी सेवा कर आणि काही राज्यांमध्ये विक्रीकर लागू होता. जुलैपासून जीएसटी, अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये त्यांच्यावर १२ टक्के (वातानुकूलित उपाहारगृहांमध्ये १८ टक्के) कर लागू झाला, पण त्यांनी आपल्या खरेदीवर भरलेल्या करांचं व्यापक इनपुट टॅक्स क्रेडिटही त्यांना मिळू लागलं. तेव्हा अपेक्षा ही होती की, हे क्रेडिट लक्षात घेऊन त्यांनी आपल्या मेन्यूकार्डावरचे दर कमी करावेत आणि मग जीएसटी वसूल करावा. प्रत्यक्षात मात्र ज्यांना नफेखोरी शक्य होती, त्यांनी आहे त्या मेन्यूकार्डावरच जीएसटी आकारायला सुरुवात केली. सर्वसाधारण ग्राहकवर्गातलं जनमत जीएसटीच्या विरोधात वळलं, त्यात उपाहारगृहांमधल्या वाढलेल्या किमती आणि काही दुकानदारांनी एमआरपीवर जीएसटी वसूल करण्याचे केलेले गैरप्रकार, हे मुख्य डोळ्यात येणारे घटक होते. सरकारकडे जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर नफेखोरीबद्दलच्या ज्या काही तक्रारी आल्या, त्यात सर्वात जास्त तक्रारी उपाहारगृहांबद्दल होत्या. देशभर गल्ल्यागल्ल्यांमध्ये पसरलेल्या उपाहारगृहांवर कारवाई करणं सरकारी यंत्रणेच्या क्षमतेबाहेर होतं. त्यामुळे जीएसटी परिषदेने शेवटी निर्णय घेतला की उपाहारगृहांवर यापुढे ५ टक्केच जीएसटी असेल, पण त्यांना खरेदीवरच्या करांचं क्रेडिट मिळणार नाही. जुलैमध्ये मेन्यूकार्डावरचे दर कमी करायला उपाहारगृहांनी विशेष उत्साह दाखवला नसला तरी आता मात्र क्रेडिट मिळणार नसल्यामुळे मेन्यूकार्डावरचे दर वाढवण्याच्या बाबतीत बऱ्याच उपाहारगृहांनी तत्परता दाखवली असल्याच्या बातम्या आहेत!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा