निसर्गनियम कोणास चुकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा याच निसर्गनियमाप्रमाणे देहान्त झाला. गेले काही दिवस ज्या गतीने त्यांची व्याधी वाढत होती, ती पाहता हे अटळ होते असे म्हणावयास हवे. त्यामुळे जे अटळ आहे त्यास धीरोदात्तपणे सामोरे जाणे हे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचे कर्तव्य होते. ते त्यांनी उत्तमपणे पार पाडले असे म्हणता येणार नाही. एक नेता म्हणून बाळासाहेब हे अद्वितीय होते यात शंका नाही. तेव्हा त्यांच्या अद्वितीय तेजाच्या परावर्तित झोतात जमेल तितके आपणही प्रकाशून घ्यावे असे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना वाटत असल्यास ते साहजिक म्हणावयास हवे. परंतु या इच्छेचा अतिरेक स्वत:च्या क्षमतेविषयी शंका निर्माण करणारा ठरेल याची जाणीव बाळासाहेबांच्या उत्तराधिकाऱ्यांनी ठेवली असे खचितच म्हणता येणार नाही. बाळासाहेबांची प्रकृती किती नाजूक आहे, ते सेनेच्या दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणातच जाणवले. तेव्हाच खरेतर अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. बाळासाहेबांचे हे भाषण हे त्यांच्या आतापर्यंतच्या प्रकृतिधर्मास जराही शोभणार नाही, इतके भावनिक होते. आयुष्यभर त्यांनी कधी मला सांभाळून घ्या, अशी याचना केली नाही. ते आपल्याच मस्तीत असायचे आणि ही मस्ती हीच बाळासाहेबांची शान होती. तेव्हा तेच बाळासाहेब माझ्या मुलानातवांना सांभाळून घ्या असे हृदयाला हात वगैरे घालणारे विधान करतील, हेच मुळात अनेकांना कृत्रिम वाटले. सर्वसाधारण परिस्थितीत बाळासाहेबांनी असे विधान कधीच केले नसते. तो त्यांचा स्वभाव नव्हता आणि पिंडही नव्हता. तेव्हा त्यांना असे विधान का करावेसे वाटले वा लागले हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर त्यांच्या गादीवर बसू पाहणाऱ्यांना द्यावे लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा