भिवंडी-वाडा या राज्य महामार्गावर वाडय़ाजवळ वैतरणा नदीवर नव्याने बांधलेल्या पुलास पुन्हा मोठे भगदाड पडल्याची बातमी वाचली (३१ जुलै). ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर पुलाचे हे काम झालेले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे या नवीन मार्गावर टोलनाके उभारून टोलची वसुली सुरू आहे.
विशेष म्हणजे पुलाला बांधून वर्षही होत नसताना जर पुलाला तिसऱ्यांदा भगदाड पडत असेल तर या पुलाचे काम कोणत्या लायकीचे झालेले आहे, हे पुरते स्पष्ट होते. या नव्या (?) पुलाच्या बाजूला १०० वर्षांपूर्वीचा जुना पूल असून तो आजही दिमाखदारपणे उभा आहे. त्यावर एकही भगदाड पडलेले नाही! याचे कारण सार्वजनिक बांधकाम खात्यातील फोफावलेल्या चराऊ कुरणात हरवले आहे. ‘
लोकसत्ता’मधील एका अग्रलेखातील (‘हे मारेकरीच’), तथ्ये वर्मी लागल्याने छगन भुजबळांनी खवळून तत्परतेने खुलासा ठोकून दिला. पण भुजबळसाहेब, भिवंडी-वाडा रस्त्याबद्दल आता तुम्ही काय म्हणाल! तुमच्या खात्यात सर्वत्र चिखलाची बजबजपुरी माजलेली आहे. जनतेचा पैसा ‘चिखलातच’ रुतत चालला आहे. हे त्वरित थांबवा.
-विनायक सहस्रबुद्धे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा