सत्यजीत तांबे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतिहासातील ‘चुकां’ची दुरुस्ती करण्याचं काम सध्या केंद्रातील सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या आसपासच्या संघटना जोरात करत आहेत. पण आज घडणाऱ्या घटना खोट्या वा अर्धसत्य स्वरूपात भविष्यात नोंदवल्या जाणं, हे आताच थांबवायला हवं. राहुल गांधी यांनी वायनाडप्रकरणी दिलेल्या प्रतिक्रियेची मोडतोड हादेखील यातलाच प्रकार आहे.

इतर अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवून, सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला धक्का देऊन आणि शिवसेनेत फूट पाडून अखेर सरकार स्थापन केलं. राज्यात हे घडत असताना देशात नूपुर शर्मा प्रकरणावरून रान पेटलं होतं. उदयपूर इथं एका शिवणकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. या व्यावसायिकानं नूपुर शर्मा यांच्या वक्तव्यांचं जाहीर समर्थन केलं होतं, असा आक्षेप हत्या करणाऱ्यांनी घेतला होता.

इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. काँग्रेसची विचारसरणी मानणारी कोणतीही व्यक्ती अशा प्रकारच्या हिंसेचं समर्थन करणार नाही. नूपुर शर्मा यांनी जे काही विधान केलं, त्याचा न्याय न्यायव्यवस्था करेल. पण त्यांच्या विधानाला समर्थन दिल्याने कोणाचीही हत्या होत असेल, तर ते निंदनीय आहे. काँग्रेसच्या विचारसरणीला अनुसरून या हत्येचा निषेध केला गेला. अगदी राहुल गांधी यांनीही याबाबत कठोर प्रतिक्रिया दिली होती. धर्माच्या नावावर सुरू असलेलं क्रौर्य खपवून घेतलं जाणार नाही, एवढ्या स्पष्ट शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी या हत्येचा निषेध केला होता.

वास्तविक या घटनेचा तपास होऊन गुन्हेगारांना शिक्षा होणं, एवढी सरळ ही बाब होती. पण सध्या कोणत्याही गोष्टीला धार्मिक रंग देऊन समाजात फूट पाडत आपली राजकीय पोळी भाजण्यात अनेकांना स्वारस्य आहे. त्यामुळे याबाबतीतही उदयपूरमधील हल्लेखोरांना काँग्रेस कशी पाठीशी घालत आहे, हे दाखवण्याची संधी केंद्रातील सत्ताधारी पक्ष आणि समर्थक यांनी साधली. निमित्त झालं, राहुल गांधी यांनी त्यांच्या वायनाड मतदारसंघात केलेल्या दौऱ्याचं आणि त्याआधी त्यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचं!

झालं काय?

तर, झालं असं की, राहुल गांधी यांच्या वायनाड येथील कार्यालयाची मोडतोड काही तरुणांनी केली. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या क्षेत्रांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर राहुल गांधी यांनी भूमिका घ्यावी, अशी मागणी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केली होती. या मागणीसाठीच त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली.

या घटनेनंतर राहुल गांधी वायनाड येथे आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी पत्रकारांनी त्यांना या हल्ल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, हे माझं कार्यालय असण्याआधी वायनाडच्या लोकांचं कार्यालय आहे. जे काही झालं ते दुर्दैवी आहे. हिंसेनं समस्येचं निराकारण होणार नाही. ज्यांनी हे केलं, ती लहान मुलं आहेत. त्यांचा मार्ग चुकला असला, तरी माझं त्यांच्याशी काहीच वैर नाही.

काँग्रेसच्या मुशीतून घडलेला कोणताही सच्चा कार्यकर्ता अशीच प्रतिक्रिया देईल. पण खरं नाट्य सुरू झालं, ते यापुढेच!

या प्रतिक्रियेतील ‘जिन भी बच्चों ने यह किया, वह भी बच्चे हैं. यह सही तरीका नहीं हैं लेकिन मेरी उनसे कोई दुश्मनी नहीं,’ हा एवढाच भाग झी न्यूजचे अँकर रोहित रंजन यांनी आपल्या १ जुलैच्या प्राइम टाइमच्या कार्यक्रमात वेगळाच रंग देऊन चालवला. त्यांनी राहुल गांधी यांच्या दोन प्रतिक्रिया एकत्र करत राहुल गांधी जणू उदयपूर घटनेबद्दलच बोलत आहेत, असं भासवलं. जे काही झी न्यूजनं दाखवलं ती दुसऱ्याच्या- त्यातही सार्वजनिक जीवनातील एका व्यक्तीच्या- अभिव्यक्तीची यथेच्छ मोडतोड होती. त्यापैकी पहिल्या काही वाक्यांमधली प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी उदयपूर घटनेबद्दलच दिली होती. त्यात ‘देशात कसं विद्वेषाचं वातावरण पसरवलं जातंय,’ याचाच उल्लेख होता. त्यानंतर ‘लहान मुलं’ हा उल्लेख असलेला वायनाड प्रकरणावरील प्रतिक्रियेचा भाग त्यावर जोडला गेला. पत्रकार रोहित रंजन एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी ‘आता तुम्हीच ठरवा, हे मारेकरी लहान मुलं आहेत की, दहशतवादी,’ असं आवाहन थेट प्रेक्षकांना केलं.

गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही. झी न्यूजने ही बातमी चालवल्यानंतर भाजपचा आयटी सेल कामाला लागला. त्यांनी ही एवढीच क्लीप काही मिनिटांतच व्हायरल केली. बातमीची सत्यासत्यता पडताळून घेणं ‘पोस्ट ट्रुथ’ कालखंडात लोक विसरलेच आहेत. त्यामुळे आपल्यासमोर येतंय, ते सगळंच खरं आहे हे मानून लोकांनीही राहुल गांधी यांना लक्ष्य करत टीका करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे माहिती व तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनीही ट्वीट करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

साहजिकच झी न्यूज आणि पत्रकार रोहित रंजन यांच्याविरोधात देशभरातून तक्रारी दाखल झाल्या. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणामागील सत्यता लोकांसमोर आणण्याचा खूप प्रयत्न केला. पण भाजपच्या प्रचारयंत्रणेसमोर सत्य समोर यायला थोडासा वेळ लागतो. अनेक राज्यांमध्ये रोहित रंजन यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या. छत्तीसगड पोलिसांनी तर रोहित रंजन यांच्यावर वॉरंट बजावून, त्यांच्या गाझियाबाद येथील घरात जाऊन त्यांना अटक करण्याचाही प्रयत्न केला.

हे सगळं सुरू असताना नूपुर शर्मा यांना भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी ज्या पद्धतीने ढाल करून लपवलं आहे, तसंच काहीसं रोहित रंजन यांच्याबाबतही होताना दिसलं. त्यांच्या समर्थनासाठी अनेक जण पुढे आले. छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई उत्तर प्रदेशच्या हद्दीत घुसून केल्याने उत्तर प्रदेश सरकारने त्यावरही आक्षेप घेतला. एवढंच नाही, तर रोहित रंजन यांनी या अटकेच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि शुक्रवारी त्यांना दिलासाही मिळाला.

आता हे प्रकरण न्यायालयात असल्याने माननीय न्यायालय जो निर्णय देईल, तो योग्यच ठरेल. पण, या सगळ्यातून आपल्या देशातल्या सध्याच्या राजकीय संस्कृतीवर मोठा प्रकाश पडतो.

केंद्रात प्रचंड बहुमतानं सत्तेत असलेला पक्ष आणि त्या पक्षाच्या सहयोगी संघटना एका बाजूला देशातील इतिहासाची मोडतोड करत हा इतिहास कसा खोटा आहे, हे उच्चरवात सांगत आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या सोयीचा इतिहास कसा बरोबर आहे, हे सिद्ध करण्यासाठी तकलादू ऐतिहासिक साधनांची जुळवाजुळवही करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला या अशा खोट्या बातम्या पसरवून, त्या बातम्यांवर लोकांना विश्वास ठेवायला भाग पाडून भविष्यात आजचा इतिहास त्यांच्याच सोयीने लिहिला जाईल, याची खबरदारीही घेत आहेत. त्यासाठीच कुटिल हेतूनं पसरवलेल्या खोट्या माहितीला ‘अभिव्यक्ती’ म्हणण्यापर्यंतचे युक्तिवाद आज केले जात आहेत.

देशातील विविध समुदायांना, विविध विचारप्रवाहांना काँग्रेसच्या संस्कृतीत नेहमीच स्थान होतं. काँग्रेस पक्षाची बांधणीच मुळात सर्व प्रवाह एकत्र येऊन झाली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रत्येक विचारधारेची व्यक्ती आहे. तरीही त्या प्रत्येक व्यक्तीत काँग्रेसची अशी एक स्वत:ची विचारधारा सामावली आहे. हा विचार सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा आहे. पण सत्ताधारी पक्षाने त्यांच्यासमोरील विरोधक ‘साम-दाम-दंड-भेद’ यापैकी कोणत्याही मार्गाने संपवण्याचंच ठरवलं आहे. त्यासाठीच हे असे एखाद्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला बदनाम करणारे खोटे व्हिडीओ पसरवले जातात, त्यावर केंद्रीय राज्यमंत्री दर्जाचा नेता ट्वीट करतो आणि तरीही ते पसरवणाऱ्यांवर काहीही कारवाई होत नाही.

देशाची राजकीय संस्कृती, देशातील लोकशाही धोक्यात आल्याचं यापेक्षा जास्त चांगलं उदाहरण दुसरं काय असू शकतं?

लेखक महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आहेत. ट्विटर : @satyajeettambe

मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caution the history of convinced is being written here asj