‘सिंचन घोटाळ्यात आरोप झाल्यावर बुद्धीला पटले नाही म्हणून मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. बीडमधील घटनेवरून अन्न व नागरीपुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असली तरी राजीनाम्याबाबत त्यांनाच विचारा. रेल्वे अपघातानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावर तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहाद्दूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर रेल्वेचे अनेक अपघात झाले पण कोणत्या रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला का,’ अशा विधानांतून उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर संदिग्ध भूमिका घेतली आहे. राजीनाम्याबाबत त्यांनाच विचारा, असे सांगत एक प्रकारे मुंडे यांना अभयच दिले. बीडमधील सरपंचाची हत्या, अवैध धंदे आणि त्यांना समर्थन देणाऱ्या स्थानिक नेतेमंडळींचे प्रताप हे विषय गेले दोन महिने चर्चेत आहेत. परळीमधील औष्णिक वीज प्रकल्पात निर्माण होणाऱ्या राखेची अवैध वाहतूक, पवनचक्कीचालकांकडून करण्यात येणारी खंडणी वसुली या साऱ्या आर्थिक हितसंबंधांतून बीड, परळीमध्ये राजकारणी – ठेकेदार- शासकीय यंत्रणा यांची अभद्र युतीच तयार झाली. पवनचक्की मालकांकडून खंडणी वसुलीस विरोध केला म्हणून सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली, असे पोलीस तपासात उघड झाले. या हत्याप्रकरणी मकोका अन्वये अटक झालेले आरोपी हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जातात. यातूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. भाजपचे बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण तापविले. जसजसे प्रकरण तापू लागले तसा मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला. खंडणी प्रकरणात अटक झालेल्या वाल्मीक कराडने कोट्यवधींची संपत्ती जमा केल्याचे पोलिसांना आढळले. या कराडला धनंजय मुंडे यांचा वरदहस्त. वास्तविक हे प्रकरण तापल्यावर एखादा असता तर राजीनामा देऊन मोकळा झाला असता. पण धनंजय मुंडे यांना मंत्रीपद सोडवेना.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा