जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा कलगीतुरा रंगत असतानाच, कोयना धरणातील पाणी सोडण्याच्या प्रश्नावरूनही सत्ताधारी आघाडीतील दोन पक्षांमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. यंदा पर्जन्यमान कमी राहिल्याने राज्याच्या दुष्काळी भागातील पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाणीसाठय़ावर हक्क सांगत ते मिळवण्याचा प्रयत्न अशा जिल्ह्यांमधील राजकीय नेते करतच राहणार. कोयनेतील पाणीवापराबाबत सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांमध्ये जो संघर्ष निर्माण झाला, तो पाण्याच्या मालकीहक्कावरून. एरवी बाराही महिने वाहती असणारी कृष्णा नदी गेल्या आठवडय़ापासून कोरडी व्हायला सुरुवात झाली आहे. राज्यातील कोयना हे एक अतिशय मोठे धरण. त्याची क्षमता १०५ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढी. गेल्या वर्षी हे धरण शंभर टक्के भरले. यंदा मात्र त्यामध्ये ८९ टीएमसी पाण्याचा साठा होऊ शकला. अशा परिस्थितीत सांगली जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळण्यातच अडचणी निर्माण होऊ लागल्या. धरणातील पाण्याचे नियोजन करणाऱ्या पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतरही त्याबाबत निर्णय होण्यास विलंब होऊ लागल्याने हा वाद चव्हाटय़ावर येऊ लागला. कोयनेच्या पाण्यावर ताकारी, टेंभू, आरफळ या सिंचन योजना अवलंबून असतात. सांगली जिल्ह्यातील तासगाव, कडेगाव, खानापूर, आटपाडी तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या तालुक्यांना या सिंचन योजनेचा प्रत्यक्ष लाभ होत असतो. पाणी सोडण्यात होणाऱ्या विलंबाने शेतातील पिके अडचणीत आली आणि त्यामुळे शेतीमध्ये शेतकऱ्यांनी केलेली गुंतवणूकही बेभरवशाची होऊ लागली. पाण्याचा हा प्रश्न राजकीय पातळीवर सोडवण्याची व्यवस्था असण्याचे खरेतर काहीच कारण नाही. तरीही प्रत्येक जिल्ह्यातील पाणीसाठय़ावर तेथील पालकमंत्रीच हक्क सांगू लागल्याने हा वाद निर्माण होतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा