महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मागील वर्षांपेक्षा सुमारे तीन टक्क्यांनी कमी लागला, हे स्वाभाविक आहे. विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्यांसह सर्व उत्तीर्णाचे अभिनंदन करत असतानाच, यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून नवे शैक्षणिक धोरण लागू होणार असल्याने त्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचे आवाहन अधिक उचित आहे. दहावीच्या परीक्षेनंतर बहुतांश विद्यार्थ्यांना भावी वाटचालीची दिशा निश्चित करणे आवश्यक असते. त्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान या विद्याशाखेतील बारावीच्या गुणांवर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या केंद्रीय प्रवेश परीक्षांचे भविष्य लक्षात येऊ शकते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतील उत्तम गुण नंतरच्या काळात टिकवून ठेवण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकते. यंदाचा बारावीचा निकाल २.९७ टक्क्यांनी कमी लागला. मागील वर्षी विद्यार्थ्यांना ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा द्यावी लागली आणि त्यासाठी वेळही जास्त मिळाला. यंदा या दोन्ही सवलती नव्हत्या. त्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे पाहायला हवे. गेल्या पाच वर्षांतील निकालाची टक्केवारी पाहिली, तर हा निकाल ८८.४१ टक्क्यांवरून (२०१८) एकदम ९९.६३ टक्क्यांची (२०२१) एक उंच उडी मारून आता ९१.२५ टक्क्यांवर आला आहे. परीक्षेतील गुणांव्यतिरिक्त मिळणाऱ्या गुणांमुळे निकालाची ही टक्केवारी वाढते, हा दावा खरा ठरला, तर मग केवळ आठ-नऊ टक्केच अनुत्तीर्ण झालेल्या आणि ३५ ते ४५ टक्के गुण मिळालेल्या पावणेदोन लाख विद्यार्थ्यांबद्दल अधिक सहानुभूती वाटायला हवी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा