पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीचे अधिकार स्वत:कडे घेणे आणि राज्यपालांऐवजी मुख्यमंत्र्यांची विद्यापीठांचे कुलपती म्हणून नियुक्ती करणे ही दोन महत्त्वाची विधेयके मंजूर करून पंजाबमधील आप सरकारने केंद्राला एक प्रकारे आव्हानच दिले आहे. पंजाबी जनतेचे हित डोळय़ांसमोर ठेवूनच हा बदल केल्याचा युक्तिवाद मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला. विधानसभेने विधेयक मंजूर केले तरीही राज्यपालांची संमती मिळत नाही तोपर्यंत त्याचे कायद्यात रूपांतर होत नाही. बिगर भाजपशासित राज्यांमधील राज्यपाल विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना वेळेत संमती देत नाहीत वा त्यांवर निर्णयच घेत नाहीत, असा आरोप केला जातो. यामुळेच विधानसभेने मंजूर केलेली विधेयके संमत करण्यासाठी राज्यपालांना कालमर्यादा घालून द्यावी, अशी मागणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. प्रकाश सिंग विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने पोलीस महासंचालकाच्या निवडीत राज्यांच्या अधिकारांवर मर्यादा आल्या. कारण या निवडीसाठी ३० वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवायची असते. आयोगाचे अध्यक्ष केंद्रीय गृह सचिवांचा समावेश असलेल्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची राज्याला शिफारस करतात. यापैकी एका अधिकाऱ्याची राज्य सरकारला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करावी लागते. सर्वोच्च न्यायालयाने ही प्रक्रिया निश्चित केली असून, पंजाब, पश्चिम बंगाल, हरयाणा, बिहार आणि केरळ या राज्यांनी या प्रक्रियेत बदल करावा म्हणून केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये फेटाळल्या होत्या. तसेच या प्रक्रियेला बगल देणारा कायदा किंवा नियम राज्यांनी केला तरी तो अस्तित्वात येणार नाही, असेही स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्रक्रिया लागू करू नये ही पंजाब सरकारचीच विनंती २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. तरीही तेथील ‘आप’ सरकारने पोलीस महासंचालक निवडीचे अधिकार स्वत:कडे घेण्याचे विधेयक मंजूर केले. या निवडीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यात केंद्रीय लोकसेवा आयोग आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. पोलीस हा विषय घटनेच्या सातव्या परिशिष्टानुसार राज्यांच्या अखत्यारीत मोडतो. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कायदा करण्याचा राज्याचा अधिकार अबाधित असल्याचा युक्तिवाद मुख्यमंत्री मान यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा