डॉ. उज्ज्वला दळवी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रोजच्या पठडीतल्या जगण्याने मेंदू आळशी होऊ लागतो. डिमेन्शियापासून दूर राहण्यासाठी रोजच्या रोज चाकोरी मोडत राहणं गरजेचं आहे..
‘‘डिमेन्शिया होऊ नये म्हणून मला औषध द्या!’’ साठीचे रहातेकाका एवढय़ाचसाठी दर आठवडय़ाला डॉक्टरांकडे हजेरी लावतात. तशी जादूई दवाई सध्या तरी अस्तित्वात नाही, पण रोजच्या जगण्यात काही साध्या गोष्टी पाळल्या तर मेंदूचा तरतरीतपणा टिकून राहू शकतो.
‘‘दिवसभरात टीव्ही-मालिका बघायला फुरसत मिळत नाही. मी रात्री जागूनच बघणार त्या!’’ कर्त्यां यमूमावशींनी जाहीरनामा काढला. स्वयंपाक, नातवंडांचे लाड, भाचरा-लेकरांचे फोन या सगळय़ा धुमाकुळात त्यांचा दिवस उडून जाई. टीव्हीसाठी रात्रीचं जागरण काही काळ चालल्यावर मावशींचं डोकं चालेचना. त्या गोंधळून नुसत्या बसून राहिल्या. मुलाने शांतपणे टीव्हीची केबल कापून टाकली. रात्रीचं जागरण थांबलं आणि पंधरवडय़ात मावशींना घरातल्या गणपतीसाठी साग्रसंगीत व्यवस्था जमली.
रोजची पुरेशी (सात ते आठ तासांची) झोप अत्यंत महत्त्वाची असते. दिवसभरात आपण अनेक वेगवेगळे अनुभव घेतो. त्या सगळय़ा अनुभवांची वर्गवारी करून त्यांना आठवणींच्या रूपाने जागच्याजागी जतन करायचं, मेंदूचं डीफ्रॅगमेंटेशन करायचं, नव्या आठवणींसाठी जागा रिकामी करायची वगैरे अनेक महत्त्वाची कामं झोपेत केली जातात. पुरेशी झोप झाली नाही तर मेंदूत अनुभवांच्या कच्च्या नोंदींची दाटीवाटी होऊन नव्या अनुभवांना जागाच रहात नाही. मेंदूच्या महत्त्वाच्या केंद्रांच्या कामांत अडथळे येतात. गोंधळ उडतो, विस्मरण होतं, बुद्धिभ्रंश होतो.
मेंदूच्या स्वास्थ्यासाठी शारीरिक व्यायामही गरजेचा असतो. जगज्जेते बुद्धिबळपटू नियमितपणे टेनिस-बॅडमिंटनसारखे अंगमेहनतीचे खेळ खेळतात ते त्यासाठीच. सहा महिन्यांतून किमान ५२ तास नियमितपणे एअरोबिक व्यायाम केला की मेंदूकडचा रक्तप्रवाह, मेंदूचा आकार आणि आकलनशक्ती वाढतात. मोहनदादा दिवशी १० हजार पावलं भरभर चालतात. रत्नेशजी तासभर पोहतात. सुधीरभाऊ सत्तरीलाही रोज टेकडी चढतात. सुकुंदाताई कुठेही जाताना बसमधून दोन स्टॉप आधी उतरून उरलेलं अंतर पायीपायीच कापतात. त्यांच्या मोबाइलमध्ये तसा जाताजाता केलेला व्यायाम मोजणारं अॅप आहे. ते शिकून घेऊन त्या दिवसभरात १० हजार पावलांचं पुण्य थेंबेथेंबे साठवतात. तेही चालतं.
आदिमानवाच्या मेंदूचा आकार आणि कुवत वाढली ती तो कळपात न राहता आखीव समाजात राहायला लागल्यापासून. कर्तव्यांच्या, नात्यांच्या, अनेक स्तरांच्या बांधकामाने उभारलेल्या समाजाशी नातं जपलं की गुंतागुंतीच्या रीतिरिवाजांनी हरघडीला मेंदूला नवं आव्हान मिळतं. अंतुनानांचे १०-१२ दोस्त रोज संध्याकाळी भेटतात. ब्रिज, बुद्धिबळासारखे बुद्धीला चालना देणारे खेळ खेळतात. नाना बासरी वाजवतात, अण्णा गातात. शहरातल्या वृद्धाश्रमांसाठी, अनाथालयांसाठी सगळे मिळून काम करतात. समाजासाठी काम करायचा आनंद घेतला, की मेंदूतली बुद्धिपोषक रसायनं वाढतात. त्याउलट एकलकोंडय़ा माणसांत मेंदूची ताकद घटत जाते.
मुलंबाळं दूर असल्याने एकटय़ा पडलेल्या, सतत काळजीत, दु:खात, ताणाखाली असलेल्या माणसांच्या बुद्धीची क्षमता घटत जाते, असं अनेक सर्वेक्षणात दिसलं आहे. ताणतणाव, चिंता, नैराश्य यांच्या परिणामाने मेंदूतल्या काही रडव्या केंद्रांची ताकद वाढते. ती विचारी केंद्रांच्या कामात अडथळे आणतात, बुद्धीची धार घटते. नियमित, योग्य रीतीने ध्यान केल्याने रडव्या केंद्रांचं दळणवळण घटतं. विचारी केंद्रांचा आकार वाढतो, त्यांची आपसांतली देवाणघेवाण वाढते, त्यांच्यामधले दळणवळणाचे पांढरे पूल जाडजूड होतात हे अनेक नामांकित विद्यापीठांनी मिळून केलेल्या अभ्यासात, एफएमआरआय प्रतिमांनी सिद्ध झालेलं आहे. ८० वर्षांच्या येसूआत्या एकटय़ाच आहेत पण एकलकोंडय़ा नाहीत. त्या आजूबाजूच्या गरीब मुलांना शिकवतात; गेली बरीच वर्ष नेमाने ध्यानही करतात. त्यांची बुद्धी अजून तल्लख आहे.
भारतीताई तर पासष्टीला गुजराती मैत्रिणींसोबत गरबा नाचतात. त्या पूर्वी कधीही नाचल्या नव्हत्या. अनोळखी गुजराती भाषेतलं गाणं शिकून त्याच्याप्रमाणे हावभाव करणं, गरब्याच्या ढंगात नाचणं हे तर आव्हान होतंच. शिवाय त्या सांघिक नाचात सोबतच्या २०-२२ जणींशी सतत जुळवून घ्यावं लागलं.
आता एफएमआरआय, ट्रॅक्टोग्राफी वगैरे प्रतिमातंत्रांनी मेंदूची प्रगती समजते. संगणकाची-मोबाइलची तंत्रं, एखादी नवी भाषा, नव्या पाककृतीसुद्धा शिकल्याने त्यांच्याशी संबंधित असलेल्या मेंदूच्या केंद्रांचा आकार, त्यांच्यातल्या पेशींची संख्या यांच्यात लक्षणीय वाढ होते. सामूहिक नाच शिकताना- करताना- शिकवताना तर सोबत नाचणाऱ्यांच्या प्रत्येक हालचालीचा, त्यांच्या देहबोलीचा आधीपासूनच अंदाज घेत आपले पुढचे पवित्रे आखावे लागतात. शरीरातल्या प्रत्येक स्नायूला तसा संवाद दरक्षणी साधावा लागतो. सर्वागाला कसरत तर होतेच आणि दृष्टिकेंद्र, संगीत-केंद्र, हातापायांच्या हालचालींचे नियंत्रक यांच्यासारखी, मेंदूच्या दोन्ही अर्धगोलातली अनेक केंद्रं एकजुटीने काम करतात. ते सगळं पुण्य भारतीताईंना लाभलं.
खरं तर अकिलि नावाच्या संस्थेचे ‘न्यूरोरेसर’ नावाचे व्हीडिओगेम्स आहेत. त्या विशिष्ट व्हीडिओगेम्सनी मेंदूचं कामकाज सुधारतं हे एफएमआरआय, पेट-स्कॅनसारख्या नव्या प्रतिमातंत्रांनी सिद्ध झालं आहे. अमेरिकेच्या औषधनियामक मंडळाने न्यूरोरेसरला औषधाचा दर्जा दिला आहे. पण त्या महागडय़ा खेळांत खर्च होणारा पैसा आणि वेळ कुठून आणायचा? डय़ूक विद्यापीठाने मेंदू तल्लख ठेवायच्या व्यायामांना ‘न्यूरोबिक्स’ असं नाव दिलं. १९९९मध्ये त्यांनी तशी ८३ शाब्दिक-गणिती कोडी तयार केली.
मेंदूचे साधेच व्यायाम..
पण रोजच्या आयुष्यात आपल्याला बुद्धिपोषक व्यायामांचा अक्षय्य-साठा निर्माण करता येईल. आपल्या रोजच्या जगण्यातली फक्त पाच टक्के कामं मेंदू सजगपणे करतो. बाकीची ९५ टक्के कामं आपण सरावाने, बिनडोकपणे करतो. दात घासणं, आंघोळ करणं, केस विंचरणं वगैरे कामं करायची आपली पद्धत, त्यातल्या हालचालींचा क्रम यांची पठडी ठरलेली असते. त्यात मेंदूला जागरूकपणे काहीही करावं लागत नाही. त्याला त्या बधिरपणाची सवय झाली की अधिक महत्त्वाच्या कामांतही विचार करणं घटत जातं. मग समाजमाध्यमांवरच्या सनसनाटी संदेशांवर विश्वास बसतो. तशीच माणसं फसव्या घोटाळय़ांचे (स्कॅम) बळी ठरतात.
म्हणून साधी साधी कामं करताना, पठडी सोडून, चाकोरीबाहेर जाऊन ती रोज वेगळय़ा क्रमाने, पद्धतीने करायला हवीत. केस विंचरायला, कणीक मळायला, दात घासायला डावाच हात वापरला, दात आधी आतून आणि मग बाहेरून घासले, गंमत म्हणून डाव्या हाताने एक अख्खं पानभर लिहिलं, अंधारात केवळ स्पर्शाने चाचपडून वस्तू ओळखल्या की मेंदूच्या पेशी खडबडून जाग्या होतात. कुठेही जाताना ठरलेल्या वाटेने न जाता रोज वेगळा आणि अधिक खडतर मार्ग शोधून गेलं की नेहमीच्या सवयीची झापडं गळून पडतात. वाटेतल्या नव्या खाणाखुणा प्रकर्षांने लक्षात येतात. मेंदूला नवा व्यायाम होतो. तो जागा राहातो. तशा व्यायामांनी आपल्या ज्ञानेंद्रियांना एकमेकांची, आपल्या शरीराच्या वेगवेगळय़ा भागांची नव्याने, ताजी ओळख होते. सतत नवं शिकत राहिलं तर त्या शिक्षणाशी संबंधित असलेल्या मेंदूच्या केंद्रांचा आकार वाढतो, त्याचे संपर्कपूल बळकट होतात.
सुषमाताईंनी बुद्धीला धार काढायचा वसाच घेतला आहे. त्या नातीला शिकवण्याच्या निमित्ताने चित्रकला शिकल्या. आजूबाजूच्या बंगाली- गुजराती- तमिळ मैत्रिणींकडून त्यांच्या पद्धतीची पक्वान्नं शिकल्या. मग साधी डाळ करताना सांबार, तॉय, ओसामण, असे वेगवेगळे प्रकार केले. तसेच प्रयोग भाज्या, पोळे वगैरेंवरही केले. चहात कढीपत्ता, हळदीची पानं घालून रुचिपालट केला. प्रत्येक गाणं ऐकताना त्याचा अर्थ, चाल नीट समजून घेतली, साथीच्या वाद्यांनाही जाणीवपूर्वक दाद दिली. हा नवा दृष्टिकोन त्यांना मैत्रिणींमुळे मिळाला. प्रवचनाला गेल्यावर तिथे रात्रीच्या स्वयंपाकाचा विचार न करता गुरुजींच्या बोलण्याशी समरस झालं तर फार मोठा आनंद मिळतो, ही जाणही त्यांना आली. त्यातल्या प्रत्येक छोटय़ाछोटय़ा गोष्टीने त्यांचा मेंदू अधिकाधिक सजग होत गेला.
त्यांना रोजनिशी लिहायची सवय होती. दोन वर्षांनी मागची पानं चाळताना त्यांना आपल्या बौद्धिक प्रवासाची जाणीव झाली आणि मैत्रिणींविषयी कृतज्ञता वाटली. त्यांना त्या काळात जे समजलं ते त्यांनी नव्या मैत्रिणींना उत्साहाने शिकवलं. शिकताना न समजलेल्या गोष्टी शिकवताना स्वच्छ कळल्या.
आपल्या नातीने तशी बौद्धिक गुंतवणूक लवकर सुरू करावी, म्हणून त्यांनी तिलाही तो प्रत्येक क्षणी शिकायचा, क्षणोक्षणी जागृत आनंद घ्यायचा गुरुमंत्र दिला. संत सोहिरोबांच्या शब्दांत – ‘अंतरींचा ज्ञानदीप मालवू नको रे’! महर्षी कर्वे शंभरी झाल्यावर गात. मेंदूची ताकद १०० टक्के वापरली तर आपलीही कांचनसंध्या तशीच लखलखीत उजळेल.