भारताच्या इतिहासात १९८४ या वर्षाची ओळख केवळ राजीव गांधींच्या काँग्रेसला ‘४०० पार’ जागा देणारे वर्ष एवढीच नाही- तशी असूही नये. याच वर्षात ‘निरमा’, ‘जयपॅन’ अशा मध्यमवर्गाला परवडणाऱ्या नाममुद्रांची सुरुवात झाली; पण दुसरीकडे फ्लॉपी डिस्कची पहिली भारतीय कंपनी ‘अॅमकेट’, ‘एचएमटी’ या सरकारी कंपनीच्या घड्याळांना शह देणारी ‘टायटॅन’, औषधनिर्मितीचे संशोधनही भारतात करू पाहणारी ‘डॉ. रेड्डीज’ अशा उद्याोगांची वाटचालही याच वर्षीपासून सुरू झाली. आज चाळिशीच्या होऊन देशभर सुपरिचित झालेल्या या भारतीय नाममुद्रांपैकी एक म्हणजे ‘नॅचरल्स आइस्क्रीम’! शहाळे, सीताफळ, अंजीर, फणस… या फळांच्या स्वादाचे आइस्क्रीम खाण्याची सवय भारतात रुजवली ती ‘नॅचरल्स’ या आइस्क्रीम-विक्रेत्या दुकानमाळेचे जनक रघुनंदन कामत यांनी. या कामत यांचे निधन १८ मे रोजी झाल्याचे जरा उशिरानेच जगाला कळले, पण ‘ते गेले तरी त्यांच्या आइस्क्रीमची चव तीच राहील’, असा विश्वास कैक चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अन्वयार्थ: छेत्रीनंतर कोण?

एवढा विश्वास संपादन करणारी संस्था उभारणे, हे रघुनंदन कामत यांचे खरे कर्तृत्व. आइस्क्रीम लोकांपर्यंत गेल्याशिवाय खपणार नाही, हे ओळखून जुहू कोळीवाड्यातल्या दुकानाखेरीज अन्य ठिकाणी त्यांनी आइस्क्रीम-दुकाने काढली… सगळीकडे चव एकसारखीच मिळेल, ताजेपणाही राखला जाईल, हे व्यावसायिक पथ्य त्यांनी पाळले. मधुमेहाचा विकार सांभाळून, ‘नॅचरल्स’च्या कामात ते ध्यासमयतेने मग्न राहिले होते. ‘आमच्या काही स्वादांना मागणी कमी असते, ते आम्ही कमीच प्रमाणात करतो. ‘प्रसादम्’ किंवा ‘तिळगूळ’ स्वादाचे आइस्क्रीम सर्वांना हवेच असते असे नाही; पण आम्ही हे प्रयोग करत असतो म्हणून आमचा मान राहातो! चित्रपट उद्याोग किती वाढला तरी ‘आर्ट फिल्म’ आपला आब राखून असतातच ना? तसेच हे!’ अशा गप्पा मारल्यासारख्या मुलाखती देणारे कामत हे पहिल्या वर्षीची गुंतवणूक आणि त्या वर्षीचे उत्पन्न यांचे आकडेही सहज सांगत- साडेतीन लाख आणि पाच लाख! पण ‘दूध-फळे आणि साखर’ यांखेरीज एखादा घटक ‘नॅचरल्स’मध्ये असतो का? किंवा, दुकानांची फ्रँचायझी (विकानमक्ता) देताना कोणकोणत्या आधारे निवड करता? ती सारीच दुकाने टिकून कशी काय राहातात? ही गुपिते मात्र त्यांच्या कुटुंबातच, दोन मुलांकडेच राहिली आहेत. मंगळूरच्या एका खेड्यातून शिक्षण सोडून, मुंबईला भावाच्याच उपाहारगृहात काम करताना रघुनंदन व्यवहारज्ञानी झाले. वडील आंबेविक्रेते, त्यामुळे ‘खऱ्या, ताज्या फळांच्या चवीचे आइस्क्रीम’ करण्याची आकांक्षा त्यांना अगदी मिसरूड फुटल्यापासून होती. पण या इच्छेला पंख मिळाले ते २९ व्या वर्षी, अन्नपूर्णा यांच्याशी विवाह झाल्यावर! त्यानंतरची ‘नॅचरल्स’ची भरभराट आज ४०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about naturals ice cream founder raghunandan kamath zws
Show comments