पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यकाळात देशातील हिंसाचार, दहशतवादी कृत्ये, जातीय दंगली यांना आळा बसल्याचा दावा भाजपकडून नेहमी केला जातो. घटनेतील ३७०व्या अनुच्छेदानुसार असलेले विशेषाधिकार रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारली, नक्षलवादाचा बीमोड झाला, असेही सांगितले जाते. मणिपूरबद्दल मात्र असे काहीच सांगता येत नाही. गेल्या दीड वर्षात केंद्र सरकारला मणिपूरमधील वांशिक संघर्ष आटोक्यात आणता आलेला नाही. परिस्थिती अद्यापही आटोक्यात येत नसल्याने केंद्राने आता पाच वर्षे केंद्रात गृहसचिवपद भूषविलेल्या अजयकुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. मणिपूरमधील वांशिक संघर्ष टिपेला पोहोचला तेव्हाही हे भल्लाच गृहसचिवपदी होते. मणिपूरमधील ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्याकरिता गृहसचिव म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते. विविध पातळीवर बैठका घेतल्या होत्या. मणिपूरमधील परिस्थिती हाताळण्याच्या भल्ला यांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्याचा केंद्राचा प्रयत्न दिसतो. मणिपूरमध्ये मे २०२३ पासून हिंसक संघर्ष उसळला आहे. मैतेई आणि कुकी-झो या दोन जमातींमध्ये सुरू झालेला हा संघर्ष एवढा टोकाला गेला की आज दोन्ही जमातींचे नागरिक परस्परांच्या हद्दीत पाय ठेवू शकत नाहीत. वांशिक संघर्षाने मणिपूरमध्ये दोन जमातींमध्ये भिंत उभी राहिली. काश्मीर, पंजाबमधील दहशतवादाप्रमाणेच मणिपूरमधील परिस्थिती गंभीर आहे. या वांशिक संघर्षात आतापर्यंत २५० हून अधिक लोक मारले गेले, लाखांहून अधिक विस्थापित झाले. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही हा संघर्ष शमवण्यात सरकारला यश आलेले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा