राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘आदर्श ग्रामनिर्माण योजना’ हा आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. एके काळी यज्ञाला जे महत्त्व होते तेच महत्त्व आजच्या काळी या योजनेला आहे. प्रत्येक गावाला आज फार पुढे जावयाचे आहे. राज्याचे किंवा राष्ट्राचे केंद्र दिल्ली नसून प्रत्येक गाव आहे. आपण आपले गाव आदर्श करू तरच राष्ट्र सुखी, समृद्ध, सामथ्र्यवान व उन्नत होईल. गावा-गावांतून आपण सुरू केलेले कार्य पाहण्यासाठी नेते, पुढारी, मंत्री येतात. महाराज म्हणतात, अनेक पुढारी मला खेडय़ांतील कार्यासंबंधी मोठय़ा आस्थेने विचारतात. अशी चिमुकली गावे आदर्श झालेली पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. पुढाऱ्यांनी गावाला भेट द्यावी हे भूषणावहच आहे, पण केवळ नेते येतात म्हणूनच काम करावे हे योग्य नाही. नाही तर त्यात दिखाऊपणा येईल. आत्मसंतोषासाठी कार्य करता आले पाहिजे. तीच खरी भक्ती ठरेल! कामातच नाम घेता येईल! देवाचे नाम घेण्यापेक्षाही देवाचे ‘असे’ काम करणेच मी अधिक श्रेष्ठ समजतो, असे महाराज स्पष्ट करतात. ग्राम आदर्श करताना श्रमदान, समयदान इत्यादी गोष्टींची अत्यंत गरज भासते. ग्रामपंचायत नसतानाही लोकांनी मनात आणले तर सर्व सोयी करू शकतात. ग्रामपंचायत सत्तेने सुधारणा करवून घेईल तर आपले गुरुदेव सेवामंडळ प्रेमाने सुधारणा करायला लावेल. आपण गावाच्या सुधारणेकडे दुर्लक्ष करतो, सार्वजनिक कामांकडे काणाडोळा करतो, अशा वेळी सरकारला ग्रामपंचायत स्थापन करावी लागते आणि मग आपलाच पैसा सक्तीने वसूल करून गावाच्या सुधारणेस लावला जातो, त्यासाठी पैशाच्या जागी दोन पैसे खर्च होतात, शिवाय गावात कलह माजतात. सेवा, प्रेम, सहकार्याने व स्वयंप्रेणेने केलेले काम टिकाऊ होते, तसे सत्तेने, नियमाने होईलच असे नाही. महाराज म्हणतात, ‘‘अस्पृश्यता व विषमता हा हिंदू धर्मावरील कलंकच नव्हे तर हे मोठे संकट आहे. जगात ख्रिस्ती धर्म, इस्लाम धर्म व बौद्ध धर्माची लोकसंख्या क्रमाने कमी आहे. त्या सर्वाहून कमी हिंदू धर्मीयांची लोकसंख्या आहे. त्यांची तत्त्वे फार उच्च व व्यापक आहेत, पण रूढींनी खूपच गोंधळ घातला आहे. ही शुद्ध तत्त्वे अद्याप व्यवस्थित व्यवहारात आणण्यात आलेली नाहीत. पुढे या थोर धर्माचे काहीच मूल्य उरणार नाही. यासाठी आपल्याला अमानुष व निर्थक रूढींना मूठमाती द्यावी लागेल. जातीने उच्च म्हणविणारा पण कामात आळशी अशाला सामान्य सेवक समजून काम देणे आणि कुळाने हलका मानला गेलेला पण गुणांनी थोर, अशा व्यक्तीला प्राधान्य देणे आज आवश्यक आहे. द्वेष-मत्सर कोणाचाही नको. सहकारिता, सद्भावना, सद्गुण, सत्प्रेम यांचे पवित्र वातावरण गावभर निर्माण करून गावाला एक आदर्श कुटुंब बनविणे हेच आजचे महान पुण्यकार्य आहे, हाच खरा धर्म आहे! अशा धर्माने रसरसलेले छोटे-मोठे आदर्श गाव पाहून कोणाच्याही हृदयात नवचैतन्य निर्माण होईल, असे कार्य आपण आपापल्या गावी करू शकलो तर तीर्थोतीर्थी जाण्याऐवजी लोक आपल्या गावाचे दर्शन घ्यायला उत्सुकतेने येतील.राजेश बोबडे