राजेश बोबडे

‘साहित्योपासकांच्या लेखनकलेचे नांगर इतक्या वेगाने पुढे सरकले आहेत की, मागचा सर्व भाग अविचार आळसादिकांच्या तणाने व्यापलेला तसाच राहून गेला आहे. व त्यांत कर्तव्याचे पीक येणेच दुरापास्त झाले आहे, त्यामुळे विद्वानांचा वर्ग कौशल्यपूर्ण लेख लिहित व भाषणे देत एकीकडे वाङ्मयक्षेत्राच्या टोकावर खेळ खेळत बसला आहे, तर दुसरीकडे अशिक्षित समाजास विविधमतांची विचित्र गुंतागुंत उकलून पुढे पाऊल टाकणेच कठीण झाले आहे. अशा स्थितीत समाजाच्या या विस्कटलेल्या घडीचे संबंध पुन्हा जोडण्याकरिता एकतर साहित्याने मागे येऊन व्यवहाराला आपल्यापरीने वर तरी न्यावे, प्रगत करावे अथवा साहित्य हे खालच्या लोकांकरिता नाहीच असे तरी सांगून टाकावे,’ असे परखड विचार साहित्याच्या होत असलेल्या एकांगी प्रगती विषयी गुरुकुंज आश्रमात विद्वानांशी हितगुज करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यक्त करतात.

साहित्याबरोबरच धार्मिकतेवरही व्यक्त होताना ते म्हणतात; ‘जसे साहित्याचे तसेच धर्माचे व परमार्थाचेही झाले आहे. वेदान्तचर्चा करणारा, केवळ वेदान्त शिकणे म्हणजेच मोक्षाला जाणे किंवा सर्वस्व साध्य होणे समजतो, तर व्यवहारी लोक, ते आम्हास काय कळणार? असे म्हणून खुशाल दुराचरण करतात. धार्मिक म्हणविणारे एकीकडे धर्माच्या वरपांगी आच्छादनाखाली अधर्माचरण करतात किंवा एकांगीवृत्तीने कर्तव्यहीन होतात, तर दुसरीकडे धर्मच वाईट, पटेल तसे वागवे अशा सोयीच्या गर्जनाही ऐकू येतात. समाजात पडलेले असे हे दोन तट काढून टाकून, प्रपंच व परमार्थ हे परस्परांस पूरक होतील व एकाच मार्गाने साधले जातील अशी जोड कोणी करून द्यावी. हा मोठा गहन प्रश्न आहे आणि हा प्रश्न सक्रियतेने सोडवल्याशिवाय दोन्ही गोष्टींचा समन्वय झाल्याशिवाय त्या दोघांनाही ईश्वराचे अखंडसुख व त्याच्या सृष्टिरचनेचा रहस्यभाव आकलन होणार नाही. तेव्हा हा विषय सज्जनांनी अगत्याने हाती घ्यावा.’ ते म्हणतात, ‘अध्यात्म और विज्ञानसे सब हो सुखी, सहयोग क्षमता यह सृष्टी बने स्वर्गही।’ असे सांगून महाराज म्हणतात, ‘माझा मार्ग भक्तीचा आहे आणि तो तसाच राहावा अशी माझी विश्वासपूर्ण इच्छा आहे. मी हे पूर्ण जाणून आहे की, अध्यात्ममार्गावरूनच सर्व मार्गाची येरझार आहे.’ महाराज आपल्या ‘लहर की बरखा’ या ग्रंथात भजनातून विद्वानांना संदेश देताना म्हणतात..

लिखते रहो, पढते रहो,

       फीर भी न होता काम है।

जब तक न वैसा आचरों,

       सब ही बने बेकाम है।।

लिखना और पढना तो सही,

       पर हद्द इसकी चाहीए।

ऐसा न हो सब देश डुबे,

       आप लिखते जाइए।।

rajesh772@gmail.com