राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जनमानसावरील प्रभाव पाहता विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपूर्वी रा. स्व. सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांनी विहिंपसाठी महाराजांकडे सहकार्य मागितले. भारतीय संस्कृतीतील प्रथा, परंपरा व रूढींचा नीट अर्थ लावून त्यांना शुद्ध व मानवोपयोगी करण्यासाठी, श्रीगुरुदेव सेवा मंडळाची स्थापना झाल्याने सर्वधर्मसमभाव मानत असतानाही महाराजांनी याला होकार दिला. महाराजांना १९६४ मध्ये पवईच्या सांदिपनी आश्रमातील संस्थापकीय सभेत विश्व हिंदू परिषदेचे सल्लागार म्हणून निवडण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करताना महाराज म्हणतात : मी सर्व धर्माना मानतो. पण याचा अर्थ माझ्या धर्माचा अभिमान मी सोडून द्यावा असा मुळीच नाही. हिंदू धर्माचा गाभा मानवता आहे. पूर्वीच्या काळातील वर्णव्यवस्था आता टिकणारी नसून हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा काळ आला आहे. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी घालवून चांगल्या प्रथा पाडण्याचा चंग बांधला पाहिजे. हिंदूंमध्ये एकतेची भावना दृढ होण्यासाठी सर्वाना सारखे संस्कार आले पाहिजेत. शास्त्रे आणि विद्या मुलांना सोप्या पद्धतीने शिकविण्यात यावे. श्रद्धा, भक्ती, विश्वास व आपापले कर्तव्यकर्म हाच श्रेयस्कर वर्णाश्रमधर्म आहे याचे आवाहन करण्यात यावे. हिंदू धर्म व्यक्तिनिष्ठ नसून समाजनिष्ठ आहे. त्यानुसार हिंदू धर्मशास्त्राचे संदर्भ लक्षात घेऊन आवश्यक तो बदल करायला पाहिजे. हे काम विश्व हिंदू परिषदेने करावे. या विचारांच्या संकल्पानेच मी या संघटनेचे सल्लागारपद स्वीकारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझे हे विचार ज्या दिवशी विश्व हिंदू परिषदेला जड होतील त्या दिवशी माझा रस्ता मोकळा राहील. कारण सर्व धर्माच्या चांगल्या गोष्टींचा मी उपासक आहे. आततायीपणाने कुणाची निंदा करणे किंवा कुणाच्या धर्मश्रद्धांची तोडफोड करणे हा केव्हाही धर्म होऊ शकत नाही. सारे धर्म माणसाला माणूस बनविण्यासाठीच आहेत. आपापल्या घरी भिन्नभिन्न देवतांचे अधिष्ठान असले तरी हिंदू धर्माची एक अशी प्रार्थना नाही. सर्व हिंदूंसाठी एकच सामुदायिक प्रार्थना असावी म्हणून तुकडोजी महाराजांनी ‘है प्रार्थना गुरुदेव से ,सह स्वर्गसम संसार हो’! अशी सामुदायिक प्रार्थना निर्माण केली.

महाराजांचा हिंदू धर्माभिमान संकुचित नव्हता, तर तो स्वामी विवेकानंदांप्रमाणे व्यापक व तात्त्विक होता. या भूमिकेतूनच महाराजांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्याला सहकार्य दिले. महाराज हिंदुत्वाबद्दल म्हणतात : 

हिंदुत्व नहीं है वेशभूषा, रंग है ना जात है।

ना पक्ष है, ना भक्ष्य है, और कोई बात है ।।

जो स्वप्रकाशी सत्य है,

            वही नित्य है, निज तत्त्व है।

जिस पर खडा यह विश्व है,

            सच्चा वही हिंदुत्व है।।

राजेश बोबडे

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintan dhara rashtrasant tukdoji maharaj influence on the public mind amy
Show comments