राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवेचे महत्त्व विशद करताना म्हणतात, गुरुदेव सेवा मंडळाच्या नावातच सेवा शब्द आहे. आपला महत्त्वाचा एक शब्द आहे सेवा, मी आणि समोरचा एकरूप आहोत या जाणिवेने परस्परांसाठी निष्काम कर्म करीत राहावे याचा अर्थ मी सेवा समजतो. प्रतिष्ठा, सन्मान आणि लोभविरहित भावनेने जे काही चांगले केले जात असेल ती सेवा होय. जिथे म्हणून काही त्रुटी असेल तिच्या पूर्तीसाठी केलेले प्रयत्न सेवा होय.

उदाहरणार्थ, एक माणूस जंगलात जात आहे. त्याला रस्त्यावर पडलेला दुसरा माणूस दिसतो. त्याला पाहून पहिल्या माणसाच्या मनात अशी प्रेरणा निर्माण होते की त्याला योग्य ती मदत करावी. मग ते मदतीचे काम तो कोणत्याही प्रलोभनाशिवाय पूर्ण करतो. असे काम कर्तव्य समजून केले जावो अथवा अंत:करणपूर्वक भावनेने केले जावो, दोन्हीचा अर्थ सेवा हाच होतो.

आजकाल अनेक जण सेवेच्या नावावर जगण्याचा प्रयत्न करतात, म्हणतात, ‘‘आधी माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा. मग मी सेवा करतो.’’ या वृत्तीला सेवा म्हणता येईल का? ती सेवावृत्ती नसून ढोंग आहे. नोकरी ही कधीच सेवा होऊ शकत नाही. परंतु ज्या वेळी माणूस आपली नोकरी सांभाळून निष्काम-भावनेने जास्तीचे काम करतो तेव्हा ती सेवा होऊ शकते.

नोकरसुद्धा सेवक मानले जाऊ शकतात. परंतु त्यासाठी अधिकारी वृत्तीपेक्षा सेवेच्या भावनेने लोकांची कामे करावी लागतील. समजा, एखादा नोकर आपल्या कामासाठी रस्त्याने निघाला आहे. रस्त्यात पडलेला एखादा दगड बाजूला करून रहदारी सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. त्या वेळी नोकरी वृत्तीचा माणूस त्या कामात सहभागी होणार नाही. उलट म्हणेल, ‘‘हे काही माझे काम नाही.’’ सेवाभावी माणूस दुसऱ्याच्या प्रगतीसाठी तळमळत असतो. ज्यांच्या मनात दुसऱ्याच्या विकासासाठी धडपडण्याची प्रेरणा जागृत होते तेच खरे सेवक होत. जो विश्वात्म्याला आपल्या प्रयत्नांनी प्रसन्न करतो, जो परस्परांशी सहकार्याची भूमिका घेतो, जो प्रत्येक जीवमात्राच्या विकासासाठी धडपडतो त्यालाच आपण सेवाभावी पुरुष मानले पाहिजे.

सेवाकार्य केल्याने सेवा करणाऱ्या सेवकाच्या वैयक्तिक जीवनातही कसा बदल होतो याबद्दल राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीतेतील सेवा सामथ्र्य अध्यायात सेवेचे महत्त्व अधारेखित करताना म्हणतात,

सेवेने अंगी सामथ्र्य येते।
जे जे बोलाल तेचि घडते।।
हस्ते परहस्ते सर्वचि होते।
काम होते त्याचे।।
सेवकास संकल्प करणे पुरे।
इच्छा होता घरी अवतरे।।
वाटेल त्यामार्गे सारे।
घडे मनासारिखे।।
परी ते नसे उपभोगास्तव।
ऐसे सेवक मानतील सदैव।।
तोचि भोगील सेवेचे वैभव। शेवटवरि।।

राजेश बोबडे
rajesh772@gmail.com

Story img Loader