राजेश बोबडे

‘उद्योगी तरुण शीलवान असू दे। दे वरचि असा दे।।’ असे जीवनकलेचे संस्कार भजनांतून जनमानसावर करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राष्ट्रधर्म, अध्यात्माबरोबरच जनतेला उद्योगधंद्यांच्या, प्रशिक्षणासाठी गुरुकुंज आश्रमसह गावोगावी १९४५ मध्ये आश्रमाच्या पंचंहोत्सवांतील गुढीपाडव्याला ‘श्रीगुरुदेव स्वावलंबन उद्योगमंदिरा’ची स्थापना केली. महाराज म्हणतात सेवामंडळ हे केवळ ‘रामधुन’ व ‘सामुदायिक प्रार्थना’ या दोनच गोष्टीचे कार्यकेंद्र नसून संस्कृती व संघटितपणासह जीवनोपयोगी इतर गोष्टींचाही समावेश त्यात पूर्णपणे आहे. सेवामंडळाची प्रार्थना ही कार्यनिवृत्तीसाठी नसून आपल्या कर्तव्यात सौंदर्य, पावित्र्य व जोम आणणारी आहे. ग्रामीण जीवन सुखी करावयाचे तर तेथील उद्योगांची वाढ करून लोकांना स्वावलंबी आणि उद्योगशील बनवणे अगत्याचे आहे. म्हणूनच ज्या गावी ‘रामधुन’ किंवा ‘सामुदायिक प्रार्थना’ पद्धतशीरपणे घेतली जाते त्या गावी असा उपक्रम सुरू करण्यात येतो की, तेथील लोकांनी फावल्यावेळी रोज आपल्या घरी सूत कातून तेथे उघडण्यात आलेल्या ‘श्रीगुरुदेव उद्योगमंदिर’ या विभागातून आपले कपडे विणून घ्यावेत.  या उद्योग-मंदिरात कापड विणून देणे, गरीब लोकांचे सूत विकत घेणे, तयार कपडे, विणकाम, भरतकाम, कुटीरउद्योग, गृहउद्योग, हातमाग इ. करणे आणि इतरांना तसे शिकवून सर्व लोकांना  उद्योगतत्पर बनविणे इत्यादी गोष्टी केल्या जातात.

हेही वाचा >>> चिंतनधारा: जब देश की शान बिखर जाये..

महाराज म्हणतात : धर्मप्रवण किंवा परमार्थी लोक उद्योगरहित असतात, असा जर कुणाचा समज झाला असेल तर, त्याला जगातील महत्कार्याची मुळीच जाणीव नाही असेच म्हणावे लागेल! आणि जर स्वत: धर्मवान लोकच तसे म्हणत असतील तर त्यांच्यासारखे देशद्रोही व धर्मघातकी विरळेच म्हणावयाचे! उद्योगाशिवाय धर्मवंतांचे जगणे भूमीला भार होणारेच होय. उद्योगाच्या नावाने भलत्याच हीन वृत्तीला इतके लोक बळी पडले की, शेठसावकारांची घराणी उद्योगाने मोठी झाली खरी, पण तो उद्योग (अपवाद वगळता) स्वत:ला चोर बनवून दुसऱ्यांवर आपल्या पापांचे शिंतोडे उडविणाराच ठरतो. अनेक लोकांचे जीवन कष्टाच्या चरकात लोभाने पिळून काढून, वर जेव्हा ‘‘हे सर्व माझ्याकरता नि माझ्या मुलाबाळांकरताच आहे’’ असे त्यांचे बोल ऐकू येतात तेव्हा हृदय थरकापू लागते! ‘‘काय हो ! देव-भक्ताला हे उद्योग-विद्योग कशाला? दोन घास मोठया लोकांच्या घरी चापावेत आणि हरिनामात मस्त राहावे!’’ असे म्हणणारे चतुर लोक समाजात पुष्कळ आहेत. पण अशा लोकांच्या बोलण्यानुसार, कार्यकर्त्यां लोकांनी आपले उचित कर्तव्य सोडून नुसतेच ‘अवलिया’ बनून राहावे, असे आमचा धर्म आम्हाला सांगत नाही! राष्ट्राला जे सुवर्णपुरीचे स्वरूप येते ते राष्ट्रातील ऐतखाऊ धनिकांमुळे नसून इमानदार उद्योगवान पुरुषांमुळेच येत असते.

महाराज म्हणतात :

एक तरी असु दे अंगी  कला !

तुकडयादास म्हणे सगळयाला!

नाहीतरि काय फुका जन्मला।

rajesh772@gmail.com