‘‘देवभक्ती व देशभक्ती एकच आहे. देश सांभाळा, धर्मही पाळा, आधी देश मग धर्म’’ असे राष्ट्रधर्माचे पाठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिले. म्हणूनच महाराजांनी देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात ब्रिटिशांच्या विरुद्ध क्रांतीची मशाल चेतवून तुरुंगवासही भोगला. महाराजांच्या जाज्वल्यपूर्ण भजनांनी जनमानस प्रभावित झालेले पाहून स्वतंत्र भारताचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी विविध संस्थानांना सार्वभौम भारतात समाविष्ट करण्यासाठी सहकार्य मिळावे म्हणून तुकडोजी महाराजांना विनंती केली. देश स्वतंत्र झाल्यावर रझाकारांच्या अन्यायाचा प्रतिकार, पोर्तुगीजांच्या अन्यायातून गोव्याची सुटका करण्यापासून हैद्राबाद, कोल्हापूर, जतसारखी संस्थाने भारत सरकारमध्ये समाविष्ट करण्यास शासनाला सहकार्य करून खऱ्या अर्थाने राष्ट्रधर्माचे पालन करून देवभक्ती व देशभक्तीची प्रचीती तुकडोजी महाराजांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराजांचे राष्ट्रकार्य पाहता पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९४९ मध्ये तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही उपाधी बहाल केली. देश स्वतंत्र झाला असतानाही निजाम राजवटीचे हैद्राबाद स्वत:ला सार्वभौम समजत होते. निजाम पुरस्कृत कासिम रिझवीचे रझाकार (गुंड) भोळय़ा प्रचंड अत्याचार करत. शासनाकडे पुरेसे पोलीस नव्हते म्हणून महाराजांनी निजामाच्या राज्यात प्रशिक्षित ग्रामसंरक्षण दलाची गावोगावी स्थापना केली. गावागावांत व्यायाम मंडळ, अन्याय प्रतिकार मंडळ स्थापन केले. निजाम स्टेटमध्ये महाराज व गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कव्वाली, ठुमरी, दादरा, गजल इत्यादी चालींवर देशभक्ती जागविणाऱ्या खंजिरी भजनांनी प्रेरित केले. रझाकारांच्या प्रतिकारासाठी युवकांना, महिलांना व जनमनाला राष्ट्रप्रेमाचे धडे देऊन तयार करण्याचे कार्य महाराजांनी केले. एकदा रझाकारांनी महाराजांची गाडी रात्री अडविली. महाराजांनी उपदेश व भजनांनी त्यांचे एवढे हृदयपरिवर्तन केले की तेसुद्धा महाराजांसोबत सहभागी झाले.

१९४८ मध्ये भारतीय लष्कराने ७०० वर्षांच्या जुलमी निजामी राजवटीचा पाडाव करून हैद्राबाद राज्याला सार्वभौम भारताचा भाग बनविले. ‘‘अमानुष अत्याचाऱ्यांना दंड देणे हा मानवताधर्म आहे, परंतु त्यासाठी आपण स्वत: मात्र अमानुष होणे आवश्यक व उचित नाही,’’ असे महाराजांनी पंडित नेहरूंना पाठविलेल्या अभिनंदन संदेशात नमूद केले होते. १९५५ मध्ये महाराजांनी आपला मोर्चा गोवा मुक्तिसंग्रामाकडे वळविला. वास्तविक गोवा मुक्तिसंग्राम १९४६ पासून डॉ. राम मनोहर लोहिया यांनी सुरू केला होता, परंतु या संग्रामाचा जोर वाढताच पोर्तुगीज, पोर्तुगालवरून जहाजाने सैन्य आणून आंदोलन चिरडून टाकत असत. १९५४ मध्ये सर्वदलीय गोवा मुक्ती समितीने अिहसक मार्गाने व आझाद गोमंतक दलाने सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून गोवा मुक्तीची नवी सुरुवात केली. नाना गोरे, सेनापती बापट, मधु लिमये, मधु दंडवते आंदोलनात सहभागी झाले. तुकडोजी महाराजांनी व गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संग्रामात उडी घेऊन तरुणांमध्ये गोवा मुक्तीसाठी जनमानस चेतविले. महाराज म्हणतात,

अपने मान को शान नही,

जब देश की शान बिखर जाये।

राजेश बोबडे

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara rashtrasant tukdoji maharaja revolution against the british in the freedom struggle of the country amy