दक्षिणेतील राज्यांमध्ये प्रादेशिक अस्मितेवर स्वार होत प्रादेशिक पक्षांना सत्ता मिळत गेली. पण या प्रादेशिक नेत्यांच्या लहरी स्वभावाचा राज्यांना तेवढाच फटकाही बसला. तमिळनाडूत एम. जी. रामचंद्रन किंवा जयललिता, आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव यांच्या कार्यकाळात हे अनुभवास आले आणि सध्या तेलंगणात के. चंद्रशेखर राव आणि आंध्रमध्ये जगनमोहन रेड्डी या दोन मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीत फार काही वेगळे अनुभवास येत नाही. आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टणम असेल ही मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची घोषणा हा त्यांच्या लहरी स्वभावाचा आणखी एक नमुनाच मानावा लागेल. केंद्रात यूपीएची सत्ता असताना काँग्रेस नेत्यांनी घातलेल्या घोळामुळे आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन झाले. तेव्हापासून आंध्र प्रदेशच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याची चिन्हे नाहीत. २०१४ मध्ये आंध्रचे विभाजन झाले आणि गेल्या नऊ वर्षांत या राज्याला अद्यापही राजधानीचे शहर वसविता आलेले नाही. या नऊ वर्षांत अमरावती, विशाखापट्टणम (प्रशासनिक), अमरावती (विधिमंडळ) तर कर्नुल (न्यायालयीन) अशा चार राजधान्यांची घोषणा झाली. पण दुर्दैवाने अद्यापही या राज्याची अधिकृत राजधानी विकसित होऊ शकली नाही. राज्याच्या विभाजनानंतर सत्तेत आलेल्या तेलुगू देशमच्या चंद्राबाबू नायडू यांनी गुंटूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी अमरावती ही राजधानी म्हणून विकसित करण्याची घोषणा केली होती. चंदीगड किंवा नवीन रायपूरनंतर अमरावतीमध्ये नियोजनबद्ध राजधानी उभारण्याची योजना होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा