सागर शिंदे (संविधान अभ्यासक)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराडमधील संघ शाखेला भेट दिली होती. त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत. आता त्याच शाखेच्या स्थानी आयोजित केलेल्य़ा ‘बंधुता परिषदे’ला विरोध का? त्या भेटीसंदर्भात ‘केसरी’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त पुरावा ठरत नाही का?
‘काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पाहतो’ या वाक्याचा संदर्भ भारतीय चळवळींना दिशा देणारा ठरणार आहे. कारण ज्या महापुरुषाने हे वाक्य म्हटले आणि ज्या संघाबद्दल म्हटले, ते दोनही विचार प्रवाह आजच्या लोकशाहीत महत्त्वाचे आहेत.
सातारा जिल्ह्यातील कराड येथे भरणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस २ जानेवारी १९४० रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती. त्या वेळी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी ही भावना व्यक्त केली होती. या ऐतिहासिक घटनेबद्दल स्थानिक स्वयंसेवकांना माहिती होते, मात्र त्याचा समकालीन पुरावा प्रकाशात आला नव्हता. अखेरीस ‘केसरी’ वृत्तपत्रात दिनांक ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने यावर पक्के शिक्कामोर्तब केले. २ जानेवारीच्या या डॉ. आंबेडकर आणि संघ भेटीच्या निमित्ताने त्याच संघस्थानावर या वर्षी ‘बंधुता परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते.
सदर पुरावा नुकताच काही महिन्यांपूर्वी समोर आल्याने त्याचा समाज जोडण्यासाठी उपयोग केला पाहिजे. या विचाराने कराड येथील त्याच संघस्थानावर ‘बंधुता परिषद’ आयोजित करण्यात आली. परंतु काही बांधव या परिषदेवर आक्षेप घेऊन पुरावा खोटा असल्याचे सांगत आहेत. संघ डॉ. आंबेडकरांचे अपहरण करत आहे, असेही म्हणत आहेत. काहींनी कार्यक्रम उधळून टाका अशा पोस्ट सामाजमाध्यमांतून प्रसारित केल्या, तर काही कार्यकर्ते आयोजकांना फोन करून धमक्या देत वाद घालत आहेत.
हेही वाचा >>> उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
खरे तर हीच दरी कमी करून मतभेद असले तरी आपुलकी, बंधुभाव वाढावा या उदात्त उद्देशाने ‘बंधुता परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, बौद्ध युवक परिषदेचे विजय गव्हाळे, आंबेडकरी नेते क्षितिज टेक्सास गायकवाड, माजी खासदार प्रदीप रावत यांनी विचार व्यक्त केले. ‘इतिहासाच्या सागरातून कोळसा उगळायचा की चंदन हे आपण ठरवायचे आहे. खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येक कृतीमधून बंधुता जोपासूया. आपली गावकी एक आहे पण भावकीसुद्धा एक झाली पाहिजे,’ असे प्रतिपादन या वेळी परिषदेचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी केले.
‘सकल हिंदू बंधू बंधू’ या विचाराने अत्यंत प्रामाणिकपणे जातीच्या भिंती पाडून समाज जोडण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेपासून करीत आला आहे. लवकरच संघ शंभराव्या वर्षात पदार्पण करणार आहे. आजवरच्या वाटचालीमागचे कारण असे की संघ परिवारात विविध सामाजिक घटकांतील कार्यकर्ते सक्रियपणे काम करत आहेत. म्हणून डॉ. आंबेडकरांनी संघाबद्दल जो आपलेपणा व्यक्त केल्याचा पुरावा उपलब्ध झाला, तो स्वयंसेवकांचा उत्साह वाढविणारा आहे.
संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी पुण्यात १९७४ मध्ये वसंत व्याख्यानमालेमध्ये ‘सामाजिक समता व हिंदू संघटन’ या विषयावर व्याख्यान दिले होते. त्यात त्यांनी अतिशय प्रागतिक सामाजिक भूमिका मांडली आहे. ‘…आता बेटी व्यवहार सर्रास व्हावा. अस्पृश्यता ही चूक आहे. इट मस्ट गो लॉक, स्टॉक अँड बॅरल! ती सर्वतोपरी नष्ट केली पाहिजे. अस्पृश्यता वाईट नसेल तर मग जगात काहीच वाईट नाही! आज जी जातिव्यवस्था आहे, ती अव्यवस्था आहे. ती विकृती आहे… जी जाऊ घातली आहे. ती आता नीट कशी जाईल याचाच सर्वांनी विचार केला पाहिजे. जे अस्पृश्यता-जातिभेद पाळतात, त्यांच्याकडे गेले पाहिजे. त्यांचे मतपरिवर्तन घडवून आणणे ही आपली जबाबदारी आहे. जे असले भेद मानतात त्यांच्यावर तुटून पडण्यापेक्षा, संघर्ष निर्माण करण्यापेक्षा, त्यांना भेटावे, त्यांच्याकडे जाऊन समजावून सांगावे. हे केले पाहिजे. असे करणे हाही कामाचा एक प्रकार होऊ शकतो. कारण हे सर्व बंधू आपलेच आहेत आणि त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झाले पाहिजे असा आपला प्रयत्न आहे…’ अशी भूमिका देवरस यांनी स्पष्टपणे मांडली.
यानुसारच संघ काम करत आहे. सामाजिक न्याय व बंधुत्वाच्या भावनेतून संघाद्वारे देशभरात आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास अशा विविध क्षेत्रांत हजारो सेवा प्रकल्प सुरू आहेत. समाजातील जातीय मानसिकता व भेदभाव दूर करून बंधुत्वाची, एकत्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी संघात अनेक कार्यक्रम उपक्रम राबविले जातात. मात्र हे समजून न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल अनेक गैरसमज समाजात पसरवले गेले आहेत. पण संघाचा हेतू आणि कार्य समजल्यावर अनेकांनी मतभेद असेल तरी सुसंवाद साधला. त्यात विद्रोही साहित्यिक नामदेव ढसाळ, लेखक गंगाधर पानतावणे, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अशी अनेक नावे सांगता येतील.
कराडमधील संघ स्वयंसेवकांना डॉ. आंबेडकर हे कराड येथील भवानी संघ शाखेत आल्याची ऐकीव माहिती होती. कराड येथील केदार गाडगीळ यांनी याबाबत संशोधन केले. गाडगीळ यांनी डॉ. आंबेडकर जेव्हा शाखेत आले होते तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या मंडळींशी संवाद साधला. दत्तात्रय टंकसाळे यांना पत्र लिहून या घटनेबाबत माहिती विचारली. दिनांक ३० ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांनी केदार गाडगीळ यांना पत्र लिहून डॉ. आंबेडकर यांनी संघ शाखेस भेट दिल्याबाबतची आठवण सांगितली. ते पत्र उपलब्ध असल्याचे सांगितले. गाडगीळ यांनी केलेल्या संशोधनानुसार त्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक आबासाहेब धोपाटे वकील, गोविंद दादासाहेब केळकर, दत्तात्रय टंकसाळे, हरिभाऊ कुलकर्णी व गोविंदराव लाटे मास्तर यांची प्रमुख उपस्थिती होती व त्यांनीच डॉ. आंबेडकरांना शाखेस भेट देण्याचे निमंत्रण दिले होते.
दरम्यान, ‘केसरी’ वृत्तपत्रात ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झालेली बातमी पुण्यातील अभ्यासक डॉ. श्रीरंग गोडबोले यांच्या पाहण्यात आली. बातमी पुढीलप्रमाणे, ‘ता. २ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब अंबेडकर हे कऱ्हाड येथे गेले असता तेथील म्युनिसिपालिटीत मानपत्र देण्याचा समारंभ झाला. यानंतर त्यांनी तेथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिली. याप्रसंगी भाषण करताना डॉ. आंबेडकर म्हणाले, काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पाहतो.’ ‘केसरी’ हे तत्कालीन प्रसिद्ध वृत्तपत्र होते. आणि त्या वेळी डॉ. आंबेडकर एक मोठे राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व होते. बातमी खोटी असती तर डॉ. आंबेडकरांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी नक्कीच आक्षेप घेतला असता, परंतु तसे काही झालेले दिसत नाही. म्हणून केसरीतील बातमीवर शंका घेण्याचे कारण नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संघ शाखा भेट, ही सत्य घटना आहे. त्यातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य, समता, सामजिक न्याय या सांविधानिक मूल्यांच्या रुजवणुकीसाठी सुसंवादाने बंधुतेचे हे कार्य अखंड सुरू ठेवूया.
© The Indian Express (P) Ltd